अजित पवारांकडून नुकसानीची पाहणी

Ajit Pawar : पुणे जिल्ह्यात अवकाळी पावसाने कहर केला आहे. बारामती, दौंड, जुन्नर, खेड, शिरूर, भोर, मुळशी, आंबेगाव, इंदापूर, पुरंदर, हवेली तालुक्यांत चांगलीच दैना केली आहे. हा पाऊस जिल्ह्यात सर्वदूर असल्याने अनेक ठिकाणी घरांची पडझड झाली तर शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. असं असताना आता नुकसानीची पाहणी करण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पावर हे आज भल्या पहाटे पुणे, इंदापूर, बारामती दौऱ्यावर आहेत.
यावेळी अजित पवारांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, माझी आई 87 वर्षाची आहे .आईचं लग्न झालं त्याला 51 वर्ष झाली .तेव्हापासून एवढा पाऊस आईनेही पाहिला नाही. बारामती दौंड इंदापूर ची वार्षिक सरासरी 14 इंच आहे .13 इंच पाऊस एका दिवसात पडला. काही ठिकाणी सात सात इंच पाऊस पडला, असं अजित पवार म्हणाले.
पुणे जिल्ह्यातील बारामती, दौंड आणि इंदापूर तालुक्यांमध्ये अवकाळी मुसळधार पावसाने मोठा कहर केला असून, अवघ्या एका दिवसात तब्बल १३ इंच पाऊस पडल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. या भागांची वार्षिक सरासरी पावसाची मर्यादा १४ इंच आहे, त्यामुळे एका दिवसात इतका पाऊस पडणं हे अतिशय धक्कादायक असल्याचं त्यांनी सांगितलं.
नीरा डावा कालवा आणि आणखी एका कालव्याला भगदाड पडल्याने अनेक गावांमध्ये पाणी शिरलं असून, सोनगाव, ढेकळवाडी, इंदापूर परिसरात घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. काही ठिकाणी सात सात इंच पाऊस झाल्याचेही नोंदले गेले आहे. शेतकऱ्यांची पिके, जनावरांचा चारा आणि नागरिकांची घरं या सर्वांचे मोठे नुकसान झाल्याचे पवार यांनी सांगितले.
हेही वाचा – मुंबईत पावासाचा रेड अलर्ट, समुद्राला भरती; चार मीटरपर्यंत लाटा उसळणार
पवार म्हणाले, “माझी आई ८७ वर्षांची आहे, तिला सुद्धा एवढा पाऊस कधीच आठवत नाही. पावसामुळे अनेक घरांना भेगा पडल्या आहेत, कालवे फुटल्यामुळे गावांत पाणी घुसलं आहे. सध्या वीजपुरवठा बंद करण्यात आला आहे. जिथे धोका नाही, तिथे वीजपुरवठा लवकरच सुरू केला जाईल.”
अधिकाऱ्यांना नुकसानग्रस्त भागांचे तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले असून, एनडीआरएफच्या दोन टीम मदतीसाठी दाखल झाल्या आहेत. नुकसानग्रस्तांना तत्काळ स्थलांतरित करण्यात आले असून, त्यांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात येत आहे.
पवारांनी स्पष्ट केले की, सध्याची हवामान परिस्थिती लक्षात घेता पेरण्या करू नयेत. “जर आताच पेरण्या केल्या आणि पुढे पावसाने ओढ दिली तर सगळी मेहनत वाया जाईल. कृषी विभाग योग्य वेळ सांगेल तेव्हाच पेरणी करावी,” असे आवाहनही त्यांनी शेतकऱ्यांना केले.
राज्य सरकारकडून नुकसान भरपाईसाठी तातडीने हालचाली सुरू झाल्या असून, मंत्रिमंडळात हा विषय मांडून पुढाकार घेण्यात येणार आहे. पवारांनी सांगितले की, अतिक्रमण हटवण्याची प्रक्रिया देखील लवकरच सुरू केली जाईल.





