..तर एकाही मशिदीवर भोंगा दिसणार नाही; राज ठाकरेंचं वक्तव्य

Raj Thackeray | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या हाती सत्ता दिली, तर एकाही मशिदीवर भोंगा दिसणार नाही, असं म्हणत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ऐन विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा मशिदीवरील भोंग्यांचा मुद्दा हाती घेतला आहे. अमरावतीचे मनसेचे उमेदवार पप्पू उर्फ मंगेश पाटील यांच्या प्रचारार्थ बुधवारी रात्री येथील सायन्सकोर मैदानावर आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते.
राज ठाकरे म्हणाले, की आम्ही हिंदू म्हणून कधी एकत्रितपणे विचार करीत नाही. हिंदू फक्त दंगलीच्या वेळी असतो. नंतर तो स्वत:च्या जातीचा होतो. आजच्या राजकीय लोकांना तेच हवे आहे. आता काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार आणि शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाला एकगठ्ठा मतदान करा, असे फतवे मुस्लीम मौलवींकडून काढले जात आहेत. आम्ही मात्र अजूनही विखुरलेले आहोत. मुस्लिमांच्या मतांसाठी बुळबुळीत सरकारे ठोस भूमिका घेताना दिसत नाहीत. पण, तुम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या हाती सत्ता दिली, तर एकाही मशिदीवर भोंगा दिसणार नाही.
हेही वाचा – ‘महाराष्ट्राच्या जनतेला परिवर्तन हवं आहे’; शरद पवार
मशिदींवरचे भोंगे बंद झाले नाही, तर मशिदीसमोर हनुमान चालिसा पठण करण्याचा इशारा मनसेने दिला होता. त्यावेळी उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होते. आम्ही आंदोलन केल्यानंतर भोंगे बंद झाले होते. पण, त्यावेळी मनसेच्या १७ हजार कार्यकर्त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले होते. ही कुणाची माणसे आहेत. कुणाला जपताहेत. मुंबईत समुद्रात अनधिकृतपणे एक मजार बांधण्यात येत होती. आम्ही ते उघड करताच एका रात्रीत ती पाडण्यात आली. हिंमत कशी होते, या लोकांची. हे लोक रस्त्यावर येऊन नमाज पठण करतात. मुस्लिमांनी त्यांचा धर्म घरात ठेवावा. तो उंबरठा ओलांडून बाहेर यायला नको, असं राज ठाकरे म्हणाले.
उद्धव ठाकरेंचा विषय आधीच आटोपलेला आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीचे लोक दुखावले जाऊ नयेत, म्हणून उद्धव ठाकरे हे स्वत:च्या वडिलांच्या नावासमोरील हिंदूहृदयसम्राट हे बिरूद काढून टाकतात. मग उरले काय. ही मंडळी त्यांच्यासाठी काम करणार. सगळे त्यांच्यासाठी. मग तुमच्यासाठी उरले काय? असंही राज ठाकरे म्हणाले.





