केंद्र सरकार मदत करण्यासाठी तयार, मदत घेणार नाहीत महाराष्ट्राचे अपरिमित नुकसान करतील : चंद्रशेखर बावनकुळे
महाविकास आघाडीची सत्ता राज्यात आली तर ते सुरूअसलेल्या योजना बंद करतील
पुणे : महाविकास आघाडीची सत्ता चुकूनही राज्यात आली, तर ते आता सुरू असलेल्या योजना बंद करतील. केंद्र सरकार मदत करण्यासाठी तयार असले तरीदेखील ते मदत घेणार नाहीत आणि महाराष्ट्राचे अपरिमित नुकसान करतील, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, शेतकऱ्यांची वीजबिल माफी, अशा अनेक योजनांना केंद्र सरकारचे सहकार्य मिळत आहे. त्यामुळेच हे डबल इंजन सरकार महाराष्ट्राच्या जनतेसाठी काम करीत असल्याचे त्यांनी प्रसिद्धीपत्रकातून सांगितले.
ते म्हणाले, ‘महायुतीमध्ये ९० टक्के जागांवर एकमत झाले आहे. केवळ दहा टक्के जागांवर एकमत बाकी आहे. तेदेखील लवकरच होईल. भाजप उमेदवारी देताना जातीचा विचार करत नाही. उमेदवार हा त्याच्या क्षमतेवर ठरतो. मतदारसंघातील जनतेचे मत काय आहे? तेथील कार्यकर्त्यांचे मत काय आहे? यावर बरेच काही अवलंबून असते. त्यामुळे समाज म्हणून कोणताही निर्णय घेण्यापेक्षा उमेदवाराच्या कर्तृत्वावर निर्णय केला जाईल. बंडखोरी नाही. त्यामुळे कोणाचीही समजूत काढण्याची आवश्यकता नाही.
उमेदवारी निश्चित करण्याचा अधिकार पक्षाच्या संसदीय समितीला आहे.
एखाद्या मतदारसंघातून दोन उमेदवार इच्छुक असतील आणि दोघांनी उमेदवारी मागितली, तर त्याला बंडखोरी म्हणता येणार नाही. पक्षाने अधिकृत उमेदवारी दिल्यानंतरही कोणी विधानसभा निवडणूक लढवत असेल, तरच तो बंडखोर ठरतो. एकापेक्षा जास्त इच्छुक असणे, ही बंडखोरी नाही. त्यामुळे कोणाचीही समजूत काढण्याची आवश्यकता नाही.





