Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीUncategorizedताज्या घडामोडीमहाराष्ट्रराष्ट्रिय

चांगली बातमी! मान्सूनच्या प्रगतीला पोषक वातावरण, हवामान विभागाची माहिती

नवी दिल्ली : येत्या ४८ तासांत मान्सूनच्या प्रगतीला अनुकूल वातावरण असल्याची माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) मंगळवारी दिली. केरळमध्ये २७ मे रोजी मान्सूनचे आगमन होणार असल्याचा अंदाज ‘आयएमडी’ने आधी व्यक्त केला होता. सध्या मोसमी वाऱ्यांची उत्तरसीमा श्रीलंकेचा दक्षिण किनारा आहे. ‘अरबी समुद्राच्या आग्नेय भाग, मालदीव, कोमोरिन प्रदेश, बंगालच्या उपसागराचा मध्यपूर्व भाग आणि ईशान्य भागातील पुढील ४८ तासांतील परिस्थिती मान्सूनसाठी पोषक आहे,’ अशी माहिती ‘आयएमडी’ने दिली आहे.

अंदमान निकोबार बेटांवर मान्सून साधारणपणे २२ मेपर्यंत पोहोचतो. यंदा मात्र मान्सूनने हा टप्पा १५ मे रोजीच ओलांडला आहे. पर्जन्यमान, वाऱ्यांचे चक्र आणि आउटगोइंग लाँगवेव्ह रेडिएशन (ओएलआर) या तीन घटकांच्या आधारे हवामान विभाग मान्सूनच्या केरळमधील आगमनाची तारीख नक्की करतो. गेल्या आठवड्यात हवामान विभागाने २५ मे रोजी मान्सूनचे केरळ किनारपट्टीवर आगमन होईल, असा अंदाज वर्तवला होता. सद्यस्थितीत कोमोरिन प्रदेश व कन्याकुमारीपर्यंत मान्सून पुढे सरकला असल्याने लवकरच केरळमध्ये धडकणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

अतिवृष्टीत ‘दामिनी’ अॅपचा आधार

पावसाळ्यात वादळ वाऱ्यासह विजेच्या कडकडात होणाऱ्या अतिवृष्टीत जीवितहानी होते. आता ही जीवितहानी टाळण्यासाठी सरकारच्या दामिनी प्रणालीचा आधार मिळणार आहे. केंद्र सरकारच्या भू विज्ञान मंत्रालयातर्फे वीज पडण्याच्या घटनेसंदर्भात प्रतिबंधात्मक उपाययोजनेंतर्गत आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने ‘दामिनी’ हे मोबाईल अ‍ॅप विकसित केले आहे. अनेकदा जीव वाचविण्यासाठी नागरिक झाडाखाली आधार घेतात. परंतु, त्या ठिकाणी धोका असल्याची माहिती असते असे नाही. या धोक्याची पूर्वसूचना मिळाल्यास योग्य सुरक्षित स्थळी नागरिक जाऊ शकतात, अशी ही प्रणाली तयार केली आहे. या अॅपच्या माध्यमातून नागरिकांचे प्राण वाचविण्यासाठी राज्य आणि जिल्हा पातळीवर अंमलबजावणी करण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button