दिल्लीत भाजपा कार्यालयाबाहेर सेलिब्रेशनची तयारी; मोदी होणार सहभागी

उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूर या पाचही राज्यांमध्ये चुरशीने लढल्या गेलेल्या विधानसभा निवडणुकांची मतमोजणी सुरू असून पंजाब वगळता चार राज्यांमध्ये भाजपा सत्तेवर येण्याची चिन्हं दिसत आहेत. यामधील सर्वाधिक लक्ष हे उत्तर प्रदेशच्या निकालाकडे लागलं होतं आणि इथे भाजपा पुन्हा एकदा सत्तेत येणार असल्याचं स्पष्ट आहे. एग्झिट पोलमध्ये उत्तर प्रदेशात पुन्हा एकदा भाजपाचं सरकार येईल असा अंदाज वर्तवण्यात आला होता. त्यानुसार योगी आदित्यनाथ पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदावर विराजमान होतील हे जवळपास स्पष्ट झालं आहे.
उत्तर प्रदेश विधानसभेत ४०३ जागा असून पक्षांना बहुमतासाठी २०२ सदस्यांचे संख्याबळ लागेल. बहुतांश मतदानोत्तर अंदाजानुसार उत्तर प्रदेशमध्ये भाजपाला पूर्ण बहुमत मिळेल असा अंदाज वर्तवण्यात आला होता. काँग्रेसला मात्र उत्तर प्रदेशात मोठा फटका बसला असून जनतेने प्रियंका गांधी यांना नाकारलं आहे. समाजवादी पक्षाने मात्र भाजपाला चांगली लढत दिल्याचं दिसत आहे. मात्र सत्तेत येण्याची त्यांची इच्छा पूर्ण होऊ शकलेली नाही.
उत्तर प्रदेश निवडणुकीत अनेक नाट्यमय घडामोडी पहायला मिळाल्या. भाजपाला अनेक मोठ्या नेत्यांनी सोडचिठ्ठी देत इतर पक्षांमध्ये प्रवेश केला. यामध्ये ओबीसी नेते स्वामी प्रसाद मौर्य, दारा सिंग चौहान यांचाही समावेश होता. त्यांनी समाजवादी पक्षात प्रवेश करताना योगी सरकारवर आपल्या समाजावर अन्याय करत असल्याचा आरोप केला.
समाजवादी पक्षाने राष्ट्रीय लोक दल, भारतीय समाज पार्टी आणि अपना दल (क) यांच्यासोबत हातमिळवणी केली होती.





