नासुप्रला पुन्हा नियोजन प्राधिकरण केल्यास रस्त्यावर उतरू

नागपूर | महाईन्यूज
नागपूर शहराचा सत्यानाश करणाऱ्या नागपूर सुधार प्रन्यास (नासुप्र) बरखास्तीची प्रक्रिया माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात सुरू झाली. त्यानुसार नगर रचना विभाग महापालिकेला हस्तांतरित करण्यात आला आहे. असे असताना पालकमंत्री नितीन राऊत यांनी नासुप्रची पुन्हा नियोजन प्राधिकरण नेमणूक करण्यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र दिले आहे. हा प्रकार दुर्दैवी आहे. नासुप्रची पुन्हा नियोजन प्राधिकरण म्हणून नेमणूक केल्यास याविरोधात शहरातील नागरिक रस्त्यावर उतरतील, असा इशारा महापौर संदीप जोशी व भाजपचे शहर अध्यक्ष व माजी महापौर प्रवीण दटके यांनी गुरुवारी संयुक्त पत्रकार परिषेदत दिला आहे.
नासुप्रने शहरातील रस्ते, नाले, मैदाने विकून खाल्ली, शहरातील नागरिकांना वेठीस धरले. चार ते पाच विश्वस्त निर्णय घ्यायचे. १ रुपया चौरस फूट दराने शासनाच्या जमिनी लाटण्यात आल्या. विशेष म्हणजे नासुप्रच्या अधिकार क्षेत्रातील ५७२ व १९०० आणि २३०० ले-आऊ ट भागात नगरसेवकांना विकास कामे करता येत नव्हती. शहरातील सर्वसामान्य नागरिकांची अडचण विचारात घेता, सर्वपक्षीय नगरसेवकांनी नासुप्र बरखास्त करण्याची मागणी केली होती. महापालिकेच्या प्रस्तावानुसार फडणवीस सरकारच्या काळात नासुप्र बरखास्तीची प्रक्रिया सुरू करण्यात आली.
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर येताच पालकमंत्री नितीन राऊ त यांनी नासुप्रच्या पुनरुज्जीवनासाठी मुख्यमंत्र्यांना पत्र दिले. त्या आधारे महाराष्ट्र शासनाचे कार्यासन अधिकारी अशोक खांडेकर यांनी महापालिका प्रशासनाला पत्र पाठवून, या प्रकरणाशी संबंधित स्वयंस्पष्टता अहवाल आदेश सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.





