20 सैनिक ही संख्या कमी नाही, लष्करप्रमुख, संरक्षण मंत्री किंवा पंतप्रधानांनी उत्तर द्यावं: गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड
पुणे : “पंतप्रधान नरेंद्र मोदी चीनने आक्रमण केलं हे मान्य करायला तयार नाहीयेत. मग 20 सैनिक कसे मारले गेले. 20 सैनिक मारले जाणं ही संख्या कमी नाही, याची जबाबदारी कोणाला तरी स्वीकारावी लागेल,” असे वक्तव्य राष्ट्रवादीचे आमदार आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे. गेल्या काही दिवसांपासून महाविकासआघाडी सरकारमध्ये तणावाचे वातावरण पाहायला मिळत आहे. त्यावरुन आव्हाडांनी विरोधी पक्षावर जोरदार टीका केलेली आहे.
“पंतप्रधान नरेंद्र मोदी चीनने आक्रमण केलं हे मान्य करायला तयार नाहीत. मग 20 सैनिक कसे मारले गेले. 1967 नंतर आजपर्यंत चीनच्या सीमेवर कोणत्याही सैनिकाने प्राण गमावलेले नाही. 20 सैनिक मारलं जाणं ही संख्या कमी नाही, याची जबाबदारी कोणाला तरी स्वीकारावी लागेल. सगळ्यांनी हात वर करुन कसं चालेल,” असेही जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत.
“चीन-भारत सीमाभागात काहीच झालं नाही, असं म्हणणं कसं चालेल, सर्व भारतीयांच्या मनात हा प्रश्न आहे. याचं उत्तर लष्कर प्रमुख, संरक्षण मंत्री किंवा पंतप्रधानांनी द्यायला हवं आहे. एक इंचही जमीन देणार नाही, अशी भूमिका घ्यायला हवीय. याबाबत आम्ही सर्व राजकीय मतभेद बाजूला ठेवून पंतप्रधानांच्या सोबत आहोत, पण सत्य समोर यायला हवं,” असे जितेंद्र आव्हाडांनी यावेळी म्हटलं आहे.