राज्यात 1 हजार 258 नव्या रुग्णांची नोंद; 6 कोरोनाबाधितांचा मृत्यू
- कोरोना रुग्णांच्या आलेखात गेल्या काही दिवसांपासून चढ-उतार
मुंबई । महाईन्यूज ।
कोरोनाच्या रुग्णांच्या आलेखात गेल्या काही दिवसांपासून चढ-उतार होत आहेत. अशातच आज राज्यात 1 हजार 258 कोरोनाच्या नव्या रुग्णांची भर पडली आहे. राज्यात सहा कोरोनाबाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यातील मृत्यूदर हा 1.82 टक्के इतका झाला. राज्यात आज दिवसभरात एकूण 1 हजार 942 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. आतापर्यंत राज्यामध्ये 79 लाख 44 हजार 923 कोरोनाबाधित बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 98.06 टक्के इतके झाले आहे.
राज्यात एकूण 9 हजार 197 सक्रिय रुग्ण संख्या आहे. त्यामध्ये मुंबईत सर्वाधिक म्हणजे 3 हजार 414 इतके रुग्ण असून त्यानंतर ठाण्यामध्ये 2 हजार 228 सक्रिय रुग्ण आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत म्हणजेच गुरुवारी दिवसभरात 6 हजार 168 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे.
बुधवारी दिवसभरात कोरोनाच्या 7 हजार 946 नव्या रुग्णांची नोंद झाली होती. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर एकीकडे देशात उत्साहाचं वातावरण असताना कोरोनाबाधितांच्या संख्येत झालेली घट ही दिलासादायक बाब आहे. देशात गेल्या 24 तासांत 9 हजार 685 रुग्ण कोरोना संसर्गातून मुक्त झाले आहेत.सध्या देशात 59 हजार 210 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. भारतात आतापर्यंत एकूण 5 लाख 27 हजार 932 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.