1 सप्टेंबरपासून देशभरात अनलॉक 4; शाळा, महाविद्यालये सुरु होण्याची शक्यता
नवी दिल्ली – कोरोनामुळे लॉकडाऊनच्या नियमांमध्ये हळू हळू शिथिलता देण्यात येत आहे. सर्व व्यवहार सुरळीत सुरु करण्यासाठी परवानगी दिली जात आहे. देशात सध्या अनलॉक 3 सुरु असून 31 ऑगस्टपर्यंत संपणार आहे. त्यानंतर 1 सप्टेंबरपासून देशभरात अनलॉक 4 बद्दलची नियमावली सरकार जाहीर करू शकतं.
अनलॉक 4 मध्ये काय सुरू होऊ शकते –
देशात 1 सप्टेंबरपासून अनलॉक 4 सुरू होत आहे. दिल्लीतील मेट्रो सुरू होण्याची वाट बघणाऱ्यासाठी आता खूशखबर आहे, कारण ही सुविधा 1 सप्टेंबरपासून सुरू होण्याची शक्यता आहे. याअगोदर दिल्लीतील वाढती कोरोना परिस्थिती पाहून 22 मार्चला मेट्रोची सुविधा बंद केली होती.
लॉकडाऊनच्या काळात DMRC ला (Delhi Metro Rail Corporation) 1300 कोटींचं नुकसान झालं आहे. दिल्ली सरकारसोबत विरोधी पक्ष असणाऱया भाजपानेही दिल्लीत मेट्रो लवकरात लवकर सुरू करण्यास साकडं घातलं आहे. त्याचबरोबर डीएमआरसीनेही सर्व तयारी केली असून केंद्र सरकारकडून ग्रीन सिग्नल मिळताच दिल्लीतील मेट्रो सुरू होईल.
केंद्र सरकार 1 सप्टेंबरपासून अनलॉक -4 सुरू करत असताना आता याकाळात शाळादेखील सुरू होऊ शकतात. यासाठी 1 सप्टेंबर ते 14 नोव्हेंबर या कालावधीत शाळांसाठी मार्गदर्शक तत्त्वे तयार झाली आहेत. आरोग्यमंत्री हर्षवर्धन राज्यातील सचिवांशी या योजनेवर चर्चा झाली आहे. काही राज्ये शाळा सुरू करण्याबद्दल अनुकूल असले तरी राज्य सरकारच्या या योजनेला पालकांकडून फारसा पाठिंबा मिळालेला नाही.