1 ऑगस्टपासून ‘या’ बँकांचे नियम बदलणार, मिनिमम बॅलन्स, डिपॉझिट, विड्रॉलवर चार्ज
मुंबई : 1 ऑगस्टपासून देशातील काही बँकांच्या व्यवहारांबाबतच्या नियमांमध्ये बदल होणार आहेत. यात अॅक्सिस बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, कोटक महिंद्रा बँक, आरबीएल बँक या बँका एक ऑगस्टपासून ट्रांजेक्शनच्या नियमात काही बदल करणार आहेत. यामधील काही बँका पैसे काढण्यासाठी आणि जमा करण्यासाठी फी वसूल करणार आहेत तर काही बँका मिनिमम बॅलन्स वाढवण्याची तयारी करत आहेत.
मेट्रो आणि शहरी भागात राहणारे बँक ऑफ महाराष्ट्राचे सेव्हिंग बँक अकाऊंट होल्डर्सला आता आपल्या अकाऊंटवर आधीच्या पेक्षा अधिक ज्यादा मिनिमम बॅलन्स ठेवावा लागणार आहे. बँकेने मेट्रो आणि शहरी भागात मिनिमम बॅलन्स 2,000 रुपये केला आहे, आतापर्यंत तो 1,500 रुपये होता. खात्यात यापेक्षा कमी बॅलन्स असल्यास मेट्रो आणि शहरी भागात 75 रुपयांचा दंड लागणार आहे. अर्धशहरी भागातील शाखांमध्ये 50 रुपये तर ग्रामीण शाखांमध्ये दंडांची रक्कम 20 रुपये आकारली जाणार आहे.
अॅक्सिस बँक ईसीएस ट्रांजेक्शनसाठी 25 रुपये घेणार
अॅक्सिस बँक आता ग्राहकांकडून प्रत्येक ईसीएस ट्रांजेक्शनवर 25 रुपयांची आकारणी करणार आहे. आधी हे फ्री होतं. आता बँकेने एकापेक्षा अधिक लॉकरच्या अॅक्सेसवर देखील चार्ज घेण्यास सुरवात केली आहे. बँक प्रति बंडल 100 रुपयांची कँश हँडलिंग फी देखील वसूल करणार आहे. कोटक महिंद्रा बँकेच्या सेव्हिंग्स आणि कॉरपोरेट सँलरी अकाऊंट होल्डर्सना प्रत्येक महिन्यात पाच फ्री ट्रांजेक्शननंतर प्रत्येक कॅश विड्रॉलवर 20 रुपये डेबिट कार्ड-एटीएम चार्ज द्यावा लागणार आहे.