३१ जुलैनंतर देशात ‘अनलॉक-३’ची प्रक्रिया सुरु होणार ?
नवी दिल्ली : देशात कोरोनाचा प्रसार वाढू लागल्यानंतर केंद्र सरकारने लॉकडाऊनची घोषणा केली. तब्बल २ ते अडीच महिने कडक लॉकडाऊन पाळल्यानंतर देशात हळूहळू अनलॉकच्या प्रक्रियेला सुरूवात झाली. याच पार्श्वभूमीवर सद्यस्थितीत देशात लॉकडाऊनसोबतच अनलॉकची प्रक्रिया सुरु आहे. येत्या ३१ जुलैला देशातील ‘अनलॉक-२’चा कालावधी संपणार आहे. त्यामुळे, त्यापुढे काय ? याकडे सध्या सर्वांचेच लक्ष आहे. सध्या केंद्र सरकार देशात ‘अनलॉक-३’ची प्रक्रिया राबविण्याच्या विचारात आहे. ‘अनलॉक ३’ अंतर्गत सर्व नियम पाळून सिनेमागृह पुन्हा खुली केली जाण्याबाबत विचार सुरु असल्याची चर्चा सुरु आहे. दरम्यान, अद्याप केंद्राकडून याबाबतची कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
‘अनलॉक-३’ अंतर्गत सिनेमागृहांसोबत जिम देखील होणार असल्याची सध्या सुरु आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, केंद्रीय माहिती प्रसारण मंत्रालय आणि सिनेमागृहांच्या मालकांमध्ये अनेक बैठकामार्फत चर्चा झालेली आहे. या बैठकांनंतर मालकांनी सिनेमागृहांच्या क्षमतेच्या ५०% प्रेक्षकांसह थिएटर सुरू करण्याबाबत तयारी दर्शविली आहे. मात्र, सुरुवातीच्या काही दिवसांमध्ये सिनेमागृहांच्या क्षमतेच्या २५% जागेत आणि सोशल डिस्टंसिंगच्या सर्व नियमांचे काटेकोर पालन करून पुन्हा सिनेमागृह सुरू करावे, अशी मंत्रालयाची इच्छा असल्याचे म्हटले जात आहे. अद्याप केंद्राकडून अधिकृतरीत्या अशी कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. त्यानंतर, देशातील चित्र पूर्णपणे स्पष्ट होणार आहे.