२०१९ मध्ये कमळच फुलणार, महाराष्ट्राचा मूड सांगतोय पंतप्रधानपदी मोदीच-सर्वे
२०१९ मध्ये लोकसभा निवडणुका पार पडणार आहेत. या निवडणुकांची तयारी सगळ्याच राजकीय पक्षांनी सुरु केली आहे. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकाही २०१९ मध्येच होणार आहेत. त्यामुळे केंद्रात काय होणार? आणि राज्यात काय होणार याच्या विविध चर्चा रंगल्या आहेत. अशात महाराष्ट्राचा मूड नेमका काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न सी वोटर्स आणि एबीपी माझाने केला. ज्यानुसार केंद्रात आणि राज्यात भाजपाचीच सत्ता येईल असा कौल मतदारांनी दिला आहे. अनुकूल समीकरणं जुळली तर देशात एनडीएला ३००, यूपीएला ११६ आणि इतर पक्षांना १२७ जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त होतो आहे.
महाराष्ट्रात जर भाजपा आणि शिवसेना युती झाली तर एनडीएला पहिल्या क्रमांकाच्या अर्थात ३४ जागा मिळतील असे हा सर्वे सांगतो. तर यूपीएला १४ जागा मिळतील असाही अंदाज आहे. महाराष्ट्रात सगळे पक्ष स्वबळावर लढले तर भाजपा आणि मित्रपक्षांना २३ जागा, काँग्रेस आणि मित्रपक्षांना १४ जागा, राष्ट्रवादी काँग्रेसला ६ तर शिवसेनेला ५ जागा मिळतील असा अंदाज आहे. पंतप्रधान म्हणून आजही नरेंद्र मोदींनाच सर्वाधिक पसंती आहे. या सर्वेनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कारभार समाधानकारक आहे असे वाटणारे ६४ टक्के आहेत. तर ३५ टक्के लोक मोदींच्या कारभारावर समाधानी नाहीत. महाराष्ट्रातील १३. ४ टक्के मतदारांचा कौल शरद पवारांना आहे. तर काँग्रेस नेत्यांची लोकप्रियता २४ टक्के इतकीच आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या महाआघाडीने मनसेला सोबत घ्यायचे का? असा प्रश्न विचारण्यात आला होता. ज्याला ४६.३ टक्के लोकांनी होय असं उत्तर दिलं आहे. तर ४८.१ टक्के लोकांनी नाही असं उत्तर दिलं आहे.
देशाचा कौल कोणाला?
एनडीए- ३०० जागा
यूपीए -११६ जागा
इतर – १२७
नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान म्हणून कसं काम केलं?
खूप समाधानकारक असं ३३.१ टक्के लोकांनी म्हटलं आहे
काही प्रमाणात समाधानकारक असं मत ३१.४ टक्के लोकांनी व्यक्त केलं आहे
मुळीच समाधानी नाही असं ३५ टक्के लोक सांगत आहेत
सांगता येत नाही अशांची संख्या ०.५ टक्के आहे
एकंदरीत सगळा सर्वे आणि मतदारांनी व्यक्त केलेले अंदाज पाहता एनडीएचीच देशात पुन्हा सत्ता येईल आणि पंतप्रधानपदी नरेंद्र मोदीच विराजमान होतील असा अंदाज व्यक्त होतो आहे.