१० वी,१२ वीचा निकाल कधी जाहीर होणार?
मुंबई | लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर आता उत्तरपतत्रिका तपासणीचे काम युध्दपातळीवर हाती घेण्यात आले आहे. दहावीच्या 40-45 टक्के तर बारावीच्या 65 टक्के उत्तरपत्रीका तपासून पूर्ण झाल्या आहेत. यावर्षी दहावीचा निकाल 20 ते 30 जुलैपर्यंत तर बारावीचा निकाल 5 ते 14 जुलैदरम्यान जाहीर करण्याचे नियोजन करण्यात आल्याची माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.
कोरोनाचा संसर्ग राज्यात दिवसेंदिवस वाढतच असून दररोज सरासरी अडीच हजार रुग्णांची भर पडत आहे. अशात बारावीचे वर्ग 15 जूनपासून सुरु करण्याचे नियोजन केले जात आहे. आगामी वर्षातील विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम परीक्षेपूर्वी पूर्ण व्हावा या हेतूने विद्यार्थ्यांना ऑनलाईन व ऑफलाईन शिक्षणाचे धडे दिले जाणार आहेत. दहावीच्या निकालानंतर अकरावीची प्रवेश प्रक्रिया संपल्यानंतर 1 ते 15 सप्टेंबर दरम्यान या विद्यार्थ्यांचे कॉलेज सुरू करण्याचेही नियोजन झाल्याचे शिक्षण विभागातील वरिष्ठ सूत्रांनी सांगितले आहे.