हजारो बेस्ट कामगारांच्या वेतनात बेकायदेशीर कपात,बेस्ट कामगारांवर उपाशी राहण्याची वेळ
कोरोनाने मुंबई शहराला तर जबर विळखा घातलेला आहे.. 24 तास धावती असणाऱ्या मुंबईला करकचून ब्रेक लागला आहे. मुंबईची लाईफलाईन असणारी लोकल सेवाही ठप्प आहे..मात्र त्यामुळे आता कामावर जाणाऱ्यांसाठी पर्याय म्हणून बसेसची सेवा उपलब्ध करून दिलेली आहे.वीजपुरवठा आणि बृहन्मुंबई परिसरात सार्वजनिक प्रवासी वाहतूक या सेवा सातत्याने देण्याचे काम बेस्ट कामगार करत आलेले आहेत. मात्र त्यांनी केलेल्या कामाची दखल घेण्याबाबत सत्ताधाऱ्यांनी उदासीनताच दाखवली आहे… आत तर असंख्य बेस्ट कामगारांच्या वेतनात बेस्ट प्रशासनाने बेकायदेशीर कपात केली आहे. त्यामुळे वेतनात कपात झालेल्या बेस्ट कामगाराला उपाशी राहण्याची वेळ आली आहे.
यामुळे कामगारांमध्ये प्रचंड असंतोष असून त्याच्या परिणाम बेस्ट उपक्रमाच्या सेवेवर झाल्यास त्याला जबाबदार शिवसेनाच असणार अशी प्रतिक्रिया बेस्ट संयुक्त कामगार कृती समितीचे नेते शशांक राव यांनी दिली आहे. जवळ जवळ १५ हजारहून जास्त कर्मचाऱ्यांना शून्य पगार असल्याचं चित्र समोर आलं आहे.शशांक राव यांनी सांगितले की, “२९ मार्च २०२० च्या केंद्र सरकारच्या परिपत्रकीय सूचनांप्रमाणे राज्य शासनाने त्यांच्या अखत्यारीत येणारी आस्थापने आणि उद्योगधंद्यांमध्ये लॉकडाऊनच्या काळातील अनुपस्थिती संदर्भाने कोणत्याही कामगारांच्या वेतनात कपात करू नये अशा सूचना दिलेल्या आहेत. मात्र या महिन्यात बेस्ट कामगारांच्या वेतनातून मार्च महिन्यापासूनच्या लॉकडाऊनच्या काळातील अनुपस्थितीबाबत कपात करण्यात आलेली आहे. १५ हजारहून जास्त कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना या महिन्यात शून्य पगार आलेला आहे. कोरोना महामारी मुंबई परिसरात अत्युच्च शिखरावर पोहोचत असताना, बेस्ट प्रशासनाने संवेदनाहीनतेचा आणि माणुसकीच्या अभावाचा कळस गाठून हजारो बेस्ट कामगारांना शून्य पागार दिला आहे. त्यामुळे या बेस्ट कामगारांना महामारीच्या काळात उपासमारीला तोंड द्यावे लागणार आहे”, असंही ते म्हणाले.
हीच परिस्थिती जर कायम राहिली तर मात्र मुंबई करांच्या अडचणींमध्ये नक्कीच वाढ होणार आहे.