स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी राष्ट्रवादीच्या कोट्यातून विधानपरिषदेवर
पुणे : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली . यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि इतर काही नेतेही होते. यावेळी राजू शेट्टी यांनी पवारांसोबत बारामतीतील कृषी विद्यालयालाही भेट दिली. तसेच तेथे सुरु असलेल्या उपक्रमांची माहिती घेतली. विशेष म्हणजे नुकतीच (11 जून) राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी देखील राजू शेट्टी यांची भेट घेतली होती.
या भेटीदरम्यान या दोघांमध्ये विधान परिषदेच्या जागेवर चर्चा झाली होती. यानंतर राजू शेट्टी यांनी घेतलेल्या पवारांच्या भेटीनंतर त्यांची विधानपरिषदेवरील वर्णी निश्चित मानली जात आहे.
राज्यपाल नियुक्त जागांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस आपल्या कोट्यातून माजी खासदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांना विधानपरिषदेवर पाठवण्याची शक्यता आहे.
याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राजू शेट्टी यांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी राजू शेट्टी यांना शरद पवार यावर अंतिम निर्णय घेतील असं सांगितलं होतं. त्यानंतर राजू शेट्टी आणि शरद पवार यांची ही भेट झाली. या भेटीत झालेल्या चर्चेचे तपशील अद्याप आलेले नाही.
दरम्यान, राजू शेट्टी म्हणाले होते, “मंत्री जयंत पाटील हे माझ्या आईच्या तब्बेतीची विचारपूस करण्यासाठी दोन दिवसापूर्वी आले होते. त्याचवेळी काही अनौपचारिक गप्पा झाल्या. बोलता बोलता ते म्हणाले, लोकसभा निवडणुकीवेळी झालेल्या समझोत्याप्रमाणे, विधानपरिषदेची एक जागा देण्याबाबत ठरलं होतं. त्यावेळी आम्हाला काही देता आलं नाही, पण आता पवारसाहेब कोकण दौऱ्यावरुन मुंबईत आल्यावर चर्चा करुन निर्णय करण्याचा प्रयत्न करु. मला वाटतंय आठवडाभरात पवार साहेबांसोबत बैठक होईल. त्यावेळी होय की नाही ते ठरेल.”