‘मोदी सरकारच्या काळात दहशतवादी घुसखोरीचा उच्चांक; गृहमंत्रालयाची धक्कादायक आकडेवारी’
महाईन्यूज | मुंबई
पाकिस्तानी सैन्याकडून भारतात अतिरेकी घुसवण्याचे प्रयत्न दिवसेंदिवस वाढत आहेत हेच गेल्या पाच वर्षांतील आकडेवारी सांगते आहे. युद्धबंदीचा करार धाब्यावर बसवून पाकिस्तान रोजच सीमेवर गोळीबार करून अतिरेकी घुसवत असताना त्यावर कोणीच बोलत नाहीये. निर्वासितांना नागरिकत्व देण्यासाठी उन्मादाचे वातावरण निर्माण केले जात असतानाच पाकिस्तानातून होणाऱ्या घुसखोरीच्या वाढत्या घटनांकडे सरकार डोळे उघडून बघणार आहे काय? अशा शब्दात सामना अग्रलेखातून शिवसेनेने नरेंद्र मोदी सरकारवर टीका केली आहे.
370 कलम रद्द केल्यापासून पाकिस्तानने तब्बल 84 वेळा प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर घुसखोरीचा प्रयत्न केला आहे. सीमेवरील विविध भागांतून झालेल्या या घुसखोरीच्या माध्यमातून तब्बल 59 पाकिस्तानी अतिरेक्यांनी देशात प्रवेश केलेला आहे व केंद्रीय गृहराज्यमंत्री किशन रेड्डी यांनीच लोकसभेत एका तारांकित प्रश्नाच्या उत्तरात ही माहिती दिलेली आहे. केंद्र सरकारच्याच वतीने ही माहिती देण्यात आल्याने ती अधिकृतच म्हणावी लागेल. याचा अर्थ स्पष्ट आहे, 370 कलम रद्द केल्यानंतरही पाकिस्तानचे डोके ठिकाणावर आलेले नाही आणि सीमेवरून कश्मीर खोऱयात अतिरेकी घुसवण्याचे पाकिस्तानी उद्योग अजूनही थांबलेले नाहीत असंही शिवसेनेनं सांगितलेलं आहे.