‘स्वराज्यरक्षक संभाजी’संदर्भातील त्या अफवांवर विश्वास ठेवू नका: अमोल कोल्हे
मुंबई |महाईन्यूज|
अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांची स्वराज्यरक्षक संभाजी ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. मालिकेतील शेवटच्या भागाचे चित्रीकरणही नुकतेच पार पडले आहे. मात्र, ही मालिका राजकीय दबावामुळं बंद करण्याचा निर्णय घेतला असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. सोशल मीडियावरही त्यासंबधीत मोठ्या प्रमाणात पोस्ट व्हायरल झाल्या आहेत. यासगळ्यावर आता डॉ. अमोल कोल्हे यांनी मौन सोडलं आहे.
डॉ. अमोल कोल्हे राजकारणात सक्रिय झाल्यामुळं त्यांनी मालिका आटोपती घेतली आहे. त्या दबावामुळंचं त्यांनी मालिका बंद करण्याचा निर्णय घेतला असल्याच्या अफवा सोशल मीडियावर पसरवल्या जात आहेत. या पोस्ट व्हायरल झाल्यानंतर डॉ. अमोल कोल्हे यांनी ट्विट करून या पोस्ट पूर्णपणे खोट्या असल्याचं स्पष्ट केलं आहे.
काय म्हणाले अमोल कोल्हे?
गेले काही दिवस स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेसंदर्भात कोणतीही शहानिशा न करता कपोलकल्पित माहितीच्या आधारे सोशल मीडिया वर अफवा फिरवण्याचा प्रयत्न केला जातोय. प्रेक्षक म्हणून आपल्याला मत व्यक्त करण्याचा अधिकार आहेच पण मालिका अजून पूर्णत्वाला गेलेली नसताना अपप्रचार करणे योग्य नाही. असं अमोल कोल्हे यांनी स्पष्ट केलं आहे.