सेनेनं पाठिंबा दिल्यास आम्ही सत्तास्थापनेचा विचार करू – काँग्रेस
तेराव्या विधानसभेची मुदत शनिवारी संपुष्टात आली असून, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सरकार स्थापण्याबाबतची प्रक्रिया सुरू केली. सर्वाधिक जागा मिळालेल्या भाजपाची सरकार स्थापन्याची तयारी आहे का, अशी विचारणा करणारे पत्र शनिवारी राज्यपालांनी भाजपाला पाठवले आहे. राज्यपालांच्या या पत्रानंतर राजकीय हलचालींना चांगलाच वेग आला आहे. त्यातच शिवसेना आणि भाजपामधील मुख्यमंत्रीपदाचा वाद मिटण्याची चिन्हे दिसत नाहीत. यामध्ये आता काँग्रेस पक्षानं उडी घेतली आहे.
भाजपा सत्तास्थापन करण्यात अपयशी ठरल्यास राज्यपालांनी सत्तास्थापन करण्यासाठी आघाडीला निमंत्रण द्यायला हवं. त्यावेळी जर शिवसेनेने पाठिंबा दिला तर आम्ही सरकार स्थापन करू, असं वक्तव्य काँग्रेस नेते मिलिंद देवरा यांनी केले आहे. यावेळी बोलताना देवरा म्हणाले की, जर राज्यपालांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सत्ता स्थापन करण्यासाठी बोलवलं आणि त्यावेळी जर शिवसेनेनं पाठिंबा दिला तर काँग्रेस याबाबत विचार करेल. काँग्रेस नेते मिलिंद देवरा यांच्या या मोठ्या वक्तव्यानंतर राज्यकीय चर्चेला उधाण आलं आहे.