साहित्यिक उत्तम बंडू तुपे यांना मुख्यमंत्री सहायता निधीतून 5 लाखाची मदत
- अमित गोरखे यांनी केली होती मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी
पिंपरी, (महा-ई-न्यूज) – लेखणीच्या बळावर मराठी साहित्याची सेवा करणा-या परंतु, वृद्धापकाळात आर्थिक विपन्नावस्थेमुळे कष्टात दिवस काढणा-या साहित्यिक उत्तम बंडू तुपे यांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून पाच लाखांची मदत करण्यात आली. गृह राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी पुण्यात येऊन तुपे यांना मदतीचा धनादेश दिला. तुपे यांना निधी देण्याबाबत भाजपचे प्रदेश सदस्य अमित गोरखे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन विनंती केली होती.
मातंग ग्रुप डेव्हलपमेंन्टच्या शिष्टमंडळाने वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेउन ज्येष्ठ साहित्यिक उत्तम बंडू तुपे यांना मदतीसाठीचे निवेदन देण्यात आले होते. अमित गोरखे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळात सुनिल वारे, डॉ. बी. एन. गायकवाड, सचिन कुचेकर, शेखर साळवे, संकेत लोंढे यांचा समावेश होता.
यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी शासनातर्फे तातडीने तुपे यांना मदत करण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर गृह राज्यमंत्री (शहरे) डॉ. रणजित पाटील यांनी शुक्रवारी (दि.18) तुपे यांच्या निवासस्थानी भेट देऊन मुख्यमंत्री सहायता निधीतून पाच लाखांचा धनादेश सुपूर्त केला. त्यांची आपुलकीने विचारपूस केली.
साहित्यिक हे आपल्या समाजाच्या जडणघडणीतील अतिशय महत्त्वाचा घटक आहेत. ज्येष्ठ साहित्यिक उत्तम बंडू तुपे यांनी आपल्या लेखणीतून नेहमीच समाजातील वंचित घटकांचे दुःख जगासमोर आणले. अनेक पुरस्कारांनी गौरव झालेल्या या प्रतिभावंत साहित्यिकाच्या हलाखीच्या परिस्थितीच्या वृत्ताची शासनाने दखल घेतली. तुपे यांच्यासारख्या प्रतिभावंत साहित्यिक, कलाकाराच्या पाठिशी शासन नेहमीच उभे राहील, असे आश्वासन डॉ. पाटील यांनी यावेळी दिले.
साहित्यिक तुपे यांच्या घरी पुरस्कार ठेवायला जागा नाही – गोरखे
”ज्येष्ठ साहित्यिक उत्तम तुपे यांनी लिहिलेली पुस्तके विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात लावली गेली. समाजाचं जळजळतं वास्तव्य आणि अनुभवांची दाहकता त्यांनी आपल्या लेखणीतून मांडली. अनेक पुरस्कारांनी त्यांचा गौरव झाला आहे. परंतु, हेच पुरस्कार ठेवायला आज त्यांच्याकडे जागा नाही. आज ते 86 वर्षाचे असून त्यांना व त्यांच्या पत्नीला पॅरेलिस झाला आहे. अशा अवस्थेत ते नीट हालचालही करु शकत नाहीत. त्यामुळे त्यांना आर्थिक मदतीची गरज होती. आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन तुपे यांना आर्थिक मदत करण्याची विनंती केली होती. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी तातडीने मदत केली. त्यानिमित्त मुख्यमंत्र्यांचे आम्ही आभारी आहोत”, अशी भावना अमित गोरखे यांनी व्यक्त केली.