नाशिकमधील पर्यावरण विषयाचा पाठपुरावा करणार : डॉ. नीलम गोऱ्हे
राज्यात तीर्थक्षेत्र विकास मंत्रालय होण्याची व्यक्त केली आवश्यकता
नाशिक । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी ।
महाराष्ट्रात मुलींचे अपहरण, शेतकरी आत्महत्येचे प्रमाण वाढत आहे. अनेक चांगल्या योजनांना स्थगिती दिलेली आहे. राष्ट्रीय अहवालानुसार अपहरणाच्या क्षेत्रात गुन्हे दाखल झाल्याच्या विषयात महाराष्ट्राचा क्रमांक दुसरा आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर प्रगती आणि विकासासाठी न्यायाचे दार उघड अशी प्रार्थना आज श्री सप्तशृंगी देवीच्या चरणी शिवसेना उपनेत्या ना. डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केली आहे. नाशिक शहरात पर्यावरणाच्या प्रश्नांचा पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे.
तसेच सप्तशृंगी देवीच्या ठिकाणी असलेल्या रोप वे मुळे भाविकांची चांगली सोय झाली आहे. तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठी जर विशेष तीर्थक्षेत्र विकास मंत्रालय असेल तर या विषयात चांगले काम होऊ शकेल, असे मत डॉ. गोऱ्हे यांनी व्यक्त केले आहे. यावेळी सप्तशृंगी देवस्थानच्या वतीने तहसीलदार बंडू कापसे आणि विश्वस्त दर्शन दहातोंडे यांनी डॉ. नीलम गोऱ्हे यांचा यावेळी महावस्त्र देऊन सत्कार केला.
या दौऱ्यात प्रज्वलित केल्या जाणाऱ्या ज्योती आणि या सर्व मंदिरातला प्रसाद, शिवसैनिकांच्या जाज्वल्य भावनासह उत्साहात मुंबईला दसरा मेळावा ठिकाणी आणण्यात येणार आहे. उद्यापासून ही मोहीम कोल्हापूर, तुळजापूर, माहूर येथे भेट होणार आहे.
शिवसेना उपनेत्या ना. डॉ. नीलम गोऱ्हे यांनी श्री. सप्तशृंगी देवी वणी, जिल्हा नाशिक येथे आज दर्शन, आरती केल्याने बये दार उघड मोहिमेच्या दुसऱ्या दिवशीही शिवसेना पदाधिकाऱ्यांचा उत्साह आणि ऊर्जा वाढली असल्याचे दिसत होते.
सोबत शिवसेना उपनेत्या ज्योती ठाकरे, शिवसेनेचे संपर्क प्रमुख भाऊसाहेब चौधरी, संगीता खोदाना, सहसंपर्क प्रमुख जयंत दिंडे, जिल्हाप्रमुख सुनील पाटील, श्यामल दीक्षित, शोभा मगर, शोभा गटकळ,भारती जाधव, चांदवड, कळवण, नाशिक तालुक्यातील महिला आघाडीच्या सदस्या, पुणे महिला आघाडी पदाधिकारी स्वाती ढमाले, विद्या होडे, शर्मिला येवले, स्त्री आधार केंद्राच्या प्रमुख विश्वस्त जेहलम जोशी, डोंबिवली महिला आघाडीच्या कविता गावंड, किरण मोंडकर,मंगला सुळे,लीना शिर्के, नाशिक जिल्ह्यातील गुड्डी रंगरेज, ओमप्रकाश (भैय्या) बाहेती आदी उपस्थित होते.