साईबाबांच्या जन्मस्थळाबाबतचे विधान मुख्यमंत्र्यांनी मागे घ्यावे-राधाकृष्ण विखे
महाईन्यूज | अहमदनगर
साईबाबांच्या जन्मस्थळाबाबत मुख्यमंत्र्यांनी केलेले विधान तातडीने मागे घ्यावे, अशी मागणी माजी मंत्री आ. राधाकृष्ण विखे यांनी येथे केली आहे. ‘शिर्डी बंद’ला पाठिंबा देत जीवनावश्यक सेवा बंदतून वगळण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पाथरीच्या विकासाला निधी देण्यास आमचा विरोध नाही, पण पाथरीकरांकडून केल्या जाणाऱ्या दाव्याला सरकारने पाठबळ देऊ नये, असे सूचित करताना या वादामागील प्रवृत्तीही आता शोधण्याची वेळ आली आहे, असे ते म्हणाले आहे.
साईबाबांच्या जन्मस्थळावरुन निर्माण झालेल्या वादाच्या पाश्र्वभूमीवर राधाकृष्ण विखे यांनी शनिवारी शिर्डी विश्रामगृहात गावातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली आहे. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना विखे यांनी बंदला पाठिंबा देत शिर्डीकर ग्रामस्थ जो निर्णय घेतील तो मान्य असल्याचे सांगितले. ते म्हणाले, की साईबाबांच्या जन्मस्थळाचे दावे यापूर्वीही ८ ते १० वेळा केले गेले. असे वाद जाणीवपूर्वक उपस्थित करण्यामागच्या प्रवृत्ती शोधण्याची गरज आहे. पाथरी परिसराचा विकास करण्यास आमचा विरोध नाही पण साईबाबांच्या जन्मस्थळाचा भावनिक मुद्दा उपस्थित करुन तो विकास नको ही आमची भूमिका आहे.
पाथरीकरांकडे साईबाबांच्या जन्माचे २९ पुरावे आहेत, तर साईबाबांचे जन्मशताब्दी वर्ष संपल्यानंतरही हे पुरावे घेऊन पुढे कोणीच आलेले नाही. दाभोळकरांनी जे मूळ साईचरित्र लिहिले आहे, त्यामध्येही साईबाबांच्या जन्मस्थळाचा कुठेही उल्लेख नाही. या साईचरित्राची मूळ प्रत संस्थानच्या ताब्यात आता आली आहे. त्याचे पुनप्र्रकाशन संस्थानने करावे. इतर भाषांमधील साईचरित्रासाठीही दाभोळकरांचेच साईचरित्र आधारभूत मानावे जेणेकरुन सातत्याने निर्माण होणारे वाद थांबले जातील, असे विखे पाटील यांनी सूचित केले.