सरकारने भरती प्रक्रिया राबवली, मात्र काहींच्या दबावाने टी रद्द झाली – इतर मागास कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार
मराठा समाजाचा समावेश ओबीसीमध्ये करा अशी मागणी करणारे राजकीय दृष्ट्या प्रेरित;
वडेट्टीवार यांचा आरोप
पुणे | प्रतिनिधी
महाराष्ट्राची सामाजिक विण उसवण्याचे काम आम्ही करत नाहिये, तर आमच्यावर आरोप करणारे करत आहेत, असा दावा इतर मागास कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केला. जे आमच्यावर आरोप करत आहेत त्यांनी इतिहास वाचावा. ‘महाविकास आघाडी सरकारने भरती प्रक्रिया राबवण्याचा प्रयत्न केला. परंतु काही जणांचा दबाव आहे त्यामुळे भरती होऊ शकली नाही. मात्र मी त्यासाठी कोणाचेही नाव घेणार नाही, असे वडेट्टीवार म्हणाले. राज्यातील भरती प्रक्रिया पुन्हा सुरू करण्याची आणि ज्यांची निवड झालीय त्यांचा नियुक्त्या लवकरात लवकर करण्याची मागणी या वेळी त्यांनी केली.
ज्या संघटना मराठा समाजाचा समावेश ओबीसी मध्ये करावा, अशी मागणी करत आहेत त्या राजकीय दृष्टीने प्रेरित आहेत असा आरोप, इतर मागास कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांनी पुण्यात केला आहे. वडेट्टीवार यांच्या उपस्थितीत पुण्यात ओबीसी, व्हीजेएनटी जनमोर्चाची संवाद परिषद पार पडली. या परिषदेत विजय वडेट्टीवार यांनी एमपीएससी परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या आणि एमपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला. या वेळी पत्रकारांशी ते बोलत होते.
मंत्री विजय वडेट्टीवार यांनीही या कार्यक्रमात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना राज्यातील भरती प्रक्रिया ही जानेवारी महिन्याच्या अखेरपर्यंत सुरू करण्यात येईल असं आश्वासन दिलं . मराठा आरक्षणाचा मुद्दा न्यायप्रविष्ठ आहे . 25 जानेवारीला सर्वोच्च न्यायालय त्यावर निर्णय देणार आहे. त्यानंतर राज्यातील भरती प्रक्रिया सुरू केली जाईल आणि एमपीएससीची परीक्षा घेतली जाईल असं विजय वडेट्टीवार म्हणालेत. परिषदेत बोलताना विजय वडेट्टीवार यांनी ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये याचा पुनरुच्चार केला. आम्ही मराठा समाजाच्या विरोधात आहोत असं खोटं पसरवलं जात असल्याच वडेट्टीवार म्हणालेत. महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शाहू महाराजांच्या विचारांचा पाईक आहे. त्यांनी सर्वांना सोबत घेऊन काम केलेलं आहे. त्यामुळे इथून पुढेही महाराष्ट्राची वाटचाल त्याच दिशेने व्हायला हवी’, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.