सध्या राज्यात प्रार्थनास्थळे उघडण्याची परवानगी दिली जाणार नाही
राज्यात प्रार्थनास्थळे उघडण्याची मागणी सध्या नागरिकांकडून केली जात आहे.मात्र कोरोना संसर्गाचा धोका अद्याप कायम असल्यानं प्रार्थनास्थळे उघडण्याची परवानगी दिली जाऊ शकत नाही, असं राज्य सरकारनं आज मुंबई उच्च न्यायालयात स्पष्ट केलंय. त्यामुळे राज्यात आणखी काही दिवस देवळं बंदच राहणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.
१५ ते २३ ऑगस्टदरम्यान पर्युषण पर्व आहे. या निमित्तानं मंदिरात जाऊन पूजा करण्याची परवानगी जैन समाजानं मागितली होती. मात्र, राज्य सरकारनं त्यास प्रतिसाद दिला नव्हता. त्यामुळं श्री ट्रस्टी आत्मा कमल लब्धीसुरिश्वरजी जैन ज्ञानमंदिर ट्रस्टने तसेच अंकित व्होरा यांनी अॅड. प्रफुल्ल शाह व अॅड. प्रकाश शाह यांच्यामार्फत रिट याचिका दाखल केल्या होत्या.
‘केंद्र सरकारने ३० मेच्या आदेशाद्वारे ८ जूनपासून सुरक्षिततेचे विशिष्ट नियम पाळून प्रार्थनास्थळे खुली करण्याची परवानगी दिली आहे. राज्य सरकारने मात्र अद्याप तशी परवानगी दिलेली नाही. एकीकडे राज्य सरकारने ठराविक संख्येत लग्न समारंभ व अंत्यसंस्कारासाठी लोकांना जमण्याची परवानगी दिली आहे तसेच केश कर्तनालय, ब्युटी पार्लर, मद्याची दुकाने, बाजारपेठा इत्यादीही सुरक्षिततेच्या नियमांसह खुली करण्याची मुभा दिली आहे. मात्र, प्रार्थनास्थळांवर करोना संसर्गाच्या कारणाखाली अद्याप बंदी कायम ठेवण्यात आली आहे. सुरक्षित वावर व अन्य नियमांच्या अटी घालून प्रार्थनास्थळांनाही परवानगी देता येऊ शकते. हवे तर गर्दी टाळण्यासाठी भक्तांना विशिष्ट वेळा दिल्या जाऊ शकतात’, असा युक्तिवाद याचिकादारांतर्फे करण्यात आला होता.