मुंबई-पुण्यासह राज्यात मुसळधार
काही काळ विश्रांती घेतल्यानंतर परतीच्या पावसाने मुंबई शहर, उपनगरांसह पुण्याला झोडपून काढले. पुण्यात मंगळवारी रात्रीपासून तर मुंबई शहर परिसरात सकाळी चार वाजेपासून पावसाचा जोर वाढला. विजेच्या कडकडाटासह पाऊस कोसळत असून, ठाणे, भिवंडी, कल्याण, डोबिंवलीत मुसळधार पाऊस सुरू आहे. तर नाशिक, लातूर, बीड, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यातही जोरदार पाऊस झाला. दरम्यान, पावसामुळे विटा-कराड महामार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे.
मुंबईकरांना दिलासा देणाऱ्या पावसाने पुन्हा मुंबई शहर आणि उपनगरांत पाऊल ठेवले आहे. राज्यभरात ठिकठिकाणी परतीचा पाऊस कोसळत असून, मुंबई, पुण्यात मंगळवारी रात्री पावसाला सुरूवात झाली. रात्रभर विजेच्या गडगडाटासह पाऊस सुरू असून, सकाळी चार वाजेनंतर पावसाचा जोर वाढला. मुंबई शहरासह नवी मुंबई, ठाणे, भिवंडी, कल्याण, डोंबिवलीत मुसळधार पाऊस सुरू आहे.
राज्यातही ठिकठिकाणी पाऊस कोसळत आहे. लातूर, सांगली जिल्ह्यात पाऊस सुरू आहे. तर नाशिक, बीड, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. पावसामुळे विटा-कराड महामार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे.
पुढील काही तासात वादळी पाऊस
पुढील चार ते सहा तासात मुंबई शहरासह, विरार, भिवंडी, कल्याण, डोंबिवली, डोंगरी, बोरिवली, गोरेगाव, मुलुंड, पोवई, जुहू, दादर, वांद्रे, चेंबूर, कुलाबा, नवी मुंबई, कुर्ला, मीरा-भाईंदर आणि ठाणे परिसरात वादळी पाऊस पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभाग आणि स्कायमेटने व्यक्त केला आहे.