सत्ता स्थापनेच्या ‘त्या’ विधानावरून चंद्रकांत पाटलांचा यू-टर्न
पुणे – राज्याच्या हितासाठी आम्ही आजही शिवसेनेसोबत एकत्र यायला तयार आहोत, असं विधान अलीकडेच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं होतं. चंद्रकांत पाटील यांच्या या वक्तव्यामुळं तर्कवितर्क लढवले जात होते. अखेर चंद्रकांत पाटील यांनी आज याबाबत खुलासा केला आहे. माझं विधान माध्यमांनी चुकीच्या पद्धतीनं दाखवलं असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. शिवसेनाच काय इतर कुठल्याही पक्षाला आमचा कोणताही प्रस्ताव नाही, असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं आहे. पुण्यात आयोजित एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
जर महाराष्ट्रात उद्या आमचं सरकार आलं तर सर्व स्थानिक स्वराज्य संस्था, सर्व विधानसभा, लोकसभा आम्ही स्वबळावरच लढणार आहोत. कारण भाजपच्या वोट बँकेवर आणि पंतप्रधान मोदींच्या नावावर विजयी व्हायचं आणि नंतर तिसरचं करायचं हे चालवून घेणार नाही, त्यापेक्षा प्रत्येकानं आपापलं लढावं, असं मी म्हटलं होतं. मात्र, माझं वाक्य उलटं वाचलं गेलं, असं त्यांनी म्हटलं आहे.