सतर्क…! पुढचे दोन दिवस अतिदक्षतेचे हलगर्जीपणा नको- मुख्यमंत्री
पुढचे दोन दिवस पुनःश्च हरिओम नको असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे. निसर्ग वादळाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. सोशल मीडियाद्वारे त्यांनी जनतेशी संवाद साधला. त्याचवेळी त्यांनी हे वक्तव्य केलं. जीवनावश्यक वस्तू व्यवस्थित सांभाळून ठेवा असंही उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. १०० ते १२५ किमीच्या वेगाने सोसाट्याचा वारा आणि पाऊस असं येणार आहे. त्यामुळे काळजी घ्या, प्रशासन तुमच्यासोबत आहेच असंही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं.
निसर्ग चक्रीवादळ महाराष्ट्राच्या उंबरठ्यावर आलं आहे. अलिबागजवळ हे वादळ धडकण्याची शक्यता आहे. हे वादळ कदाचित हल्ली काही दिवसांमध्ये झालेल्या वादळांपेक्षा मोठं चक्रीवादळ आहे. प्रार्थना हीच आहे की हे वादळ हवेत विरुन जावं. प्रार्थनेला यश नक्कीच मिळेल असा विश्वास वाटतो असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. आपण सज्ज आहोतच. NDRF च्या १५ तुकड्या आहेत. तसेच नौदल, वायुदल, लष्कर आणि हवामान विभाग या सगळ्यांमध्येही समन्वय आहे असंही उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. करोनाचं संकट आपण जसं थोपवून धरलं आहे आणि ते परतवून लावणार आहोत तसंच हे वादळाचं संकट आपण परतवून लावू असंही उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं.
केंद्र सरकार तुमच्यासोबत आहे जी काही मदत लागेल ती सांगा असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं. तसंच सोमवारी देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनीही यासंदर्भात सर्वतोपरी मदत करणार असल्याचं व्हिडीओ कॉन्फरन्सिंगमध्ये सांगितल्याची माहितीही उद्धव ठाकरेंनी दिली.