संवैधानिक मूल्ये म्हणजेच स्वातंत्र्य, समता, बंधुता – अरुण चाबुकस्वार
- न्यू सिटी प्राईड शाळेत संविधान दिन उत्साहात साजरा
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना शाळेकडून अभिवादन
पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी
रहाटणी येथील क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले एज्युकेशन फाऊंडेशन संचालित न्यू सिटी प्राईड इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी संस्थेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
पोलीस निरीक्षक सुरेश भालेराव, सामाजिक कार्यकर्ते तात्या शिनगारे, राजेश गायकवाड, श्रीपाल आगरवाल यावेळी उपस्थित होते. शाळेच्या शिक्षिका चारुशीला फुलपगार यांनी विद्यार्थ्यांना संविधानाबाबत मार्गदर्शन केले.
संस्थेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार म्हणाले की, “आजच्याच दिवशी म्हणजे २६ नोव्हेंबर १९४९ रोजी राज्यघटनेचा स्वीकार केला गेला. त्यामुळे आज संपूर्ण देशात संविधान दिन म्हणून साजरा करण्यात येतो. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या अथक परिश्रमाने आणि बौद्धिक कौशल्याने या देशातील तमाम लोकांना न्याय देण्याचे काम संविधानाच्या माध्यमातून केले आहे. त्यामुळे प्रत्येक भारतीयांचे आद्य कर्तव्य ठरते की संवैधानिक जी मूल्ये आहेत ती प्राणपणाने जपणे. ही संवैधानिक मूल्ये म्हणजे स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्यायाची आहेत.
यावेळी शाळेतील विद्यार्थ्यानी व शिक्षकांनी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे समूह वाचन केले. प्रतिज्ञा घेतली. यावेळी २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबई दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या सर्व विरपुत्रांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. सूत्रसंचालन प्रणाली मगर आणि संस्कृती गेवारे या विद्यार्थिनींनी केले. ममता मंगलो हिने आभार मानले.
संविधानामुळेच भारतीयांना समान हक्क – चाबुकस्वार
लोकशाही व्यवस्थेत राजकर्त्यांवर सर्वात मोठी जबाबदारी असते. जर राज्यकर्ते जनतेच्या हिताची जपणूक करण्यास असमर्थ ठरत असतील तर न्याय पालिकेवर ही जबाबदारी येऊन पडते. म्हणजे कोणत्याही परिस्थितीत संवैधानिक मूल्यांवर जर घाला घातला जात असेल तरी तो हाणून पाडला जावा. म्हणजे या देशातील सर्वसामान्य माणसांना न्याय मिळू शकेल, अशी व्यवस्था निर्माण करण्यात आली आहे. त्यामुळेच भारतीय संविधानाच्या उद्देशिकेप्रमाणे भारत हे सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही प्रजासत्ताक आहे. या आदर्शांना अनुसरून भारतातील प्रत्येक नागरिकांस संविधानाने, सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय आचार, विचार, धर्म, श्रद्धा यांचे स्वातंत्र्य आणि राजकीय समानता व समान संधी देण्याचे अभिवचन दिले आहे. अशा प्रकारचे संविधान जगाच्या पाठीवर कोणत्याही देशात निर्माण झाले नाही”, असे अरुण चाबुकस्वार यांनी सांगितले.