संरक्षण मंत्री म्हणाले- सैनिकांच्या धाडसावर अभिमान
नवी दिल्ली | भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये एलएसीजवळ झालेल्या हिंसाचाराच्या 36 तासानंतर अखेर मोदी सरकारची प्रतिक्रिया समोर आली आहे. गालवन येथे झालेल्या घडामोडींवर चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 19 जून रोजी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. तर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी भारतीय जवान शहीद होणे अतिशय वेदनादायी आहे. तरी भारतीय जवानांच्या धाडसावर अभिमान आहे असे म्हटले आहे. भारतीय जवानांनी धाडस दाखवून सर्वोच्च परंपरा निभावत आपल्या आयुष्याची आहुती दिली. त्यांचे बलिदान राष्ट्र कधीच विसरणार नाही असेही ते पुढे म्हणाले आहेत.
राजनाथ सिंह यांनी सांगितल्याप्रमाणे, चीनसोबत झालेल्या हिंसाचारात शहीद जवानांच्या कुटुंबियांसोबत आहोत. या कठिण समयी त्या कुटुंबियांच्या खांद्याला खांदा लावून अख्खा देश उभा आहे. आम्हाला आमच्या सैनिकांच्या धाडसावर गर्व आहे. लडाखमध्ये समुद्रसपाटीपासून 14 हजार फुट उंचीवर गालवन येथे भारतीय सैनिक आणि चिनी सैनिकांमध्ये हिंसाचार झाला. यात चिनी सैनिकांनी भारतीयांवर काठ्या, दगड आणि धारदार शस्त्रांनी हल्ले केले. यामध्ये एका भारतीय कमांडरसह 20 जवान शहीद झाले. सोबतच, जखमी झालेल्या 135 भारतीय जवानांपैकी 4 जणांची प्रकृती चिंताजनक आहे.