देशभरातील पाऊस, पूरपरिस्थितीसाठी हवामान बदल, वाढते तापमान जबाबदार
- सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायर्न्मेंटमधील पर्यावरणतज्ज्ञांचे मत
नवी दिल्ली : देशभरातील अनेक राज्यांमध्ये यावर्षी मुसळधार पावसाने जनजीवन पार विस्कळीत करून टाकले आणि यात १०० हून अधिक लोकांचे बळी गेले. पावसाच्या या बेभरवशाच्या स्वरूपासाठी पर्यावरणतज्ज्ञांनी हवामान बदल आणि जगभरातील वाढते तापमान यांना दोष दिला आहे.
काही तज्ज्ञांनी ‘कार्बन फूटप्रिंट’ कमी करण्यावर भर दिला आहे, तर ही नैसर्गिक घटना नसून अनियोजित बांधकामांचा परिणाम असल्याचे काही तज्ज्ञांचे मत आहे.
यावर्षीच्या मोसमी हंगामात झालेल्या असाधारण पावसामुळे देशातील अनेक भागांत सध्या तीव्र पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. खासकरून उत्तर प्रदेश व बिहार यांना त्याचा फटका बसला आहे. गेल्या पाच दिवसांत सुमारे ११० लोक मरण पावले आहेत. उत्तर प्रदेशात ७९ बळी गेले असून, बिहारमध्ये २८ लोकांनी पुरामुळे जीव गमावला आहे.
हवामान बदलामुळे अनियमित पाऊस येत असल्यामुळे कार्बन उत्सर्जन कमी करण्याची आवश्यकता असल्याचे सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायर्नमेंटमधील हवामान धोरण संशोधक तरुण गोपालकृष्णन यांनी सांगितले. हवामानातील बदलाचा परिणाम, मोसमी पावसाचे मोठे प्रमाण मर्यादित दिवसांमध्ये केंद्रित होण्यासह पावसाचे स्वरूप अनियमित होण्यात होत आहे आणि त्यामुळेच पूर उद्भवत आहे, असे ते म्हणाले.