शीख भाविक, अधिकारी यांना प्रवेश नाकारल्याने पाकिस्तानचा निषेध
भारतीय उच्चायुक्तालयाचे इस्लामाबादेतील अधिकारी व नानकानासाहिब गुरूद्वाराला भेट देण्यासाठी आलेले यात्रेकरू यांना प्रवेश नाकारून छळ केल्याच्या प्रकरणी भारताने तीव्र चिंता व्यक्त केली असून या मुद्दय़ावर भारत व पाकिस्तान यांच्यातील द्विपक्षीय संबंध भारताने तीव्र निषेध नोंदवल्याने आणखी खालावले आहेत.
भारताने निषेध व्यक्त करताना म्हटले आहे, की पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने शीख भाविकांना प्रवासाची परवानगी दिली होती पण नंतर हे भाविक व भारतीय उच्चायुक्तालयातील अधिकारी यांची छळवणूक करण्यात आली. २१ व २२ नोव्हेंबर रोजी त्यांना गुरूद्वारा नानकाना साहिब व गुरूद्वारा सच्चा सौदा येथे जाण्यास परवानगी नाकारण्यात आली. पाकिस्तानातील करतारपूर येथे शीख धर्मस्थळाकडे जाण्यासाठी सीमेच्या दोन्ही बाजूंनी मार्ग उपलब्ध करून देण्याचे दोन्ही देशांनी मान्य केले होते. मात्र, नंतर तेथे गेलेल्या भारतीय शीख भाविकांना खलिस्तानचे समर्थन करणारे फलक दाखवले गेले, पाकिस्तानने त्यांच्या भूमीचा वापर भारतविरोधी कारवायांसाठी करू देणे योग्य नाही. १९७२ चा शिमला करार व १९९९ चा लाहोर जाहीरनामा यांचा विचार करता पाकिस्तानने भारताच्या सार्वभौमत्वास धोका होईल अशा कृतींना थारा न देण्याचे कबूल केले होते.पाकिस्तानच्या सध्याच्या कृती या शीख यात्रेकरूंना नानकानासाहिब येथे भेट देण्याची परवानगी देण्याच्या सद्हेतूशी विरोधाभास निर्माण करणाऱ्या आहेत, भाविकांना पाकिस्तान परराष्ट्र मंत्रालयाने परवानगी दिली व तेथे गेल्यानंतर प्रवेश नाकारला. त्यामुळे भारतीय भाविकांना दूतावास संपर्क देण्यात भारतीय अधिकाऱ्यांना यश आले नाही. त्यांना त्यांची राजनैतिक कर्तव्ये पार पाडता आली नाहीत. भारतीय अधिकाऱ्यांनी सांगितले की, शीख भाविकांची ही लागोपाठ तिसरी भेट असून पाकिस्तानने उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यांना सुरक्षेच्या कारणास्तव भारतीय शीख भाविकांना भेटू दिले नाही.