शिवाजी महाराजांसोबत मोदींची तुलना करुन चूक केली नाही, पुस्तकावर जयभगवान गोयल ठाम
नवी दिल्ली | छत्रपती शिवाजी महाराज आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वादग्रस्त तुलनेवरुन संपूर्ण महाराष्ट्रात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. पण या पुस्तकाचे लेखक आणि भाजप नेते जयभगवान गोयल हे आपल्या म्हणण्यावर ठाम आहेत. पुस्तक मागे घेण्याची जी मागणी होतेय त्याबद्दल एका मराठी वृत्तवाहिनीने विचारले असता, त्यांनी म्हटलं, “पुस्तक तर आता बाजारात आलेलं आहे. छापून झालेलं आहे. मात्र पक्षाचा आदेश अंतिम असेल.” “छत्रपती शिवाजी महाराज आणि नरेंद्र मोदी या दोघांचाही मी पूजक आहे. मला कुणाच्याही भावना दुखावायच्या नाहीत. मात्र अनेक वर्षानंतर देशाला असा पंतप्रधान मिळाला आहे जो छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणे धाडसी निर्णय घेतोय,” असं म्हणत त्यांनी आपल्या दाव्याला पुष्टी जोडली आहे.
भाजप नेते जयभगवान गोयल यांच्या ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ यांच्या या वादग्रस्त पुस्तकाविरोधात राज्यभरात निदर्शनं सुरु आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी केल्याने जनतेत रोष आहे. भाजपवगळता सर्वच राजकीय पक्ष आणि वंशजांनी या पुस्तकाचा विरोध करत ते मागे घेण्याची मागणी केली आहे. जयभगवान गोयल पुढे म्हणाले की, “मोदींच्या येण्यामुळे जगभरात भारताचा गौरव वाढला आहे. यापूर्वी आपला देश धर्मशाळा बनला होता. आता सीएए लागू झालं आहे. आज मोदींनी त्यांना सन्मान दिला, नागरिकत्व दिलं. जसे शिवाजी महाराज निर्णय घ्यायचे, तसे निर्णय घेणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. या माझ्या भावना आहेत. मी मोदींना शिवाज महाराजांच्या रुपात पाहतो. माझ्या या भावनांमुळे दुसऱ्या कोणाच्याही भावना दुखावण्याचा माझा हेतू नाही.