‘शिवाजी कोण होता’ पुस्तकांच्या प्रति वाटून थेरगावात शिवजयंती उत्साहात
संभाजी ब्रिगेडतर्फे विविध कार्यक्रमाचे आयोजन, 390 पुस्तकांचे नागरिकांना वाटप
पिंपरी |महाईन्यूज |प्रतिनिधी|
संभाजी ब्रिगेडच्या वतीने काॅम्रेड गोविंद पानसरे लिखित ‘शिवाजी कोण होता’ या 390 पुस्तकांच्या प्रति वाटून छत्रपती शिवाजी महाराजांची 390 वी जयंती थेरगाव येथे उत्साहात साजरी करण्यात आली.
अखंड विश्र्वाचे प्रेरणास्थान, विश्ववंदनीय कुलवाडी भुषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३९० व्या जयंतीनिमित्त मंगळवारी (दि.18) रात्री 12 वाजता फटक्यांची आतिषबाजी करण्यात आली. सकाळी पहाटे ५ वाजल्यापासून शिवरायांच्या पोवाड्यांनी वातावरण आनंदीमय झाले होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला संभाजी ब्रिगेड पुणे जिल्हा उपाध्यक्ष सतिश काळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर नागरिकांना गोविंद पानसरे लिखीत ‘शिवाजी कोण होता’ या पुस्तकाच्या ३९० प्रतीचे वाटप करण्यात आले. तसेच अल्पपोहार, मिठाईचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमास संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हा कार्याध्यक्ष गणेश दहिभाते, संघटक वैभव जाधव, रशीदभाई सय्यद, ज्ञानदेव लोभे, संतोष बादाडे, विनोद घोडके, परशुराम रोडे, ज्ञानेश्वर साळुंके, रमजान शेख, सुभाष साळुंके, डॉ मोहन पवार, माजी नगरसेविका जनाबाई जाधव, संतोष वाेव्हळ, फारुख शेख, दिपक जोगदंड, डॉ चव्हाण, खंडु गायके, परमेश्वर शेळके, निलेश शेंडगे आदी उपस्थित होते.
यावेळी संभाजी ब्रिगेडचे वक्ते परमेश्वर जाधव म्हणाले की, आपल्या महापुरुषांच्या जयंती नाचून नाही तर वाचन करुन साज-या करायला हव्यात. वाचनाने माणसाचे मस्तक सुधारते. सुधारलेले मस्तक कुणाचेही गुलाम होत नाही. त्यामुळे वाचनाची सवय तरुणांनी लावली पाहिजे असे आवाहन त्यांनी केले. रेड स्वस्तीक सोसायटीचे रोशन मराठे यांनीही शिवचरित्रावर आपले विचार मांडले तर शेकापचे हरीष मोरे यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे आयोजन शशीकांत काळे, सखाराम माने, उमेश काळे, लालासाहेब कानडे, पवन हावळे, चैतन्य अनभुले, वैभव काळे, सोमनाथ भंडारे यांनी केले