शिवसेनेसोबत जाणे म्हणजे दगडापेक्षा वीट मऊ- जयंत पाटील
पुणे | महाईन्यूज
भारतीय जनता पक्षाची विचारधारा वेगळी असल्याने सत्तास्थापनेसाठी भाजपबरोबर जाणार नाही. दगडापेक्षा वीट मऊ या नात्याने शिवसेनेबरोबर जाण्याचे संकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी रविवारी पुण्यात दिले. राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेले काही आमदार आमच्या संपर्कात आहेत. मात्र, आम्ही मेगा भरती नव्हे, तर मेरिटवर भरती करू, असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.
राज्यातील राष्ट्रपती राजवट, शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीचे सरकार स्थापन होण्याची शक्यता आणि सत्ता स्थापनेसाठी कोणत्या पक्षाला पाठिंबा द्यायचा, या संदर्भात चर्चा करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीची बैठक रविवारी पुण्यात झाली. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला प्रमुख नेते उपस्थित होते. या बैठकीनंतर जयंत पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला.राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष एकत्र येऊन सत्ता स्थापन करेल, अशी राजकीय शक्यता व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर भाजपबरोबर जाणार का, असा प्रश्न विचारला असता जयंत पाटील म्हणाले, की भाजपची आणि राष्ट्रवादी काँग्रेसची विचारधारा वेगळी आहे. त्यामुळे भाजपबरोबर जाणार नाही. या परिस्थितीत शिवसेनेबरोबर कसे जाणार, असे विचारले असता, शिवसेना म्हणजे दगडापेक्षा वीट मऊ, असे उत्तर त्यांनी दिले. राज्यातील जनतेच्या मनातील पाच वर्षे टिकणारे मजबूत सरकार देण्याचा प्रयत्न आहे. त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.