शिवसेनेचे आमदार जयपूरला रवाना होणार
मुंबई | राज्यात सत्ता स्थापनेच्या घडामोडींना वेग आला आहे. मातोश्रीवरील उद्याच्या बैठकीनंतर शिवसेनेचे आमदार जयपूरला रवाना होणार आहेत. तर दुसरीकडे उद्याच काँग्रेसच्या आमदारांची बैठक होत आहे. या बैठकीत काँग्रेसचा विधीमंडळ नेता निवडण्यात येणार आहे. दिल्लीपाठोपाठ आता मुंबईतही सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आलाय. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या बैठका सुरू असताना शिवसेनेच्या गोटातही वेगानं घडामोडींना घडत आहेत.
शिवसेनेच्या आमदारांना उद्या मुंबईत बोलवण्यात आले आहे. उद्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंशी भेट झाल्यानंतर या सर्व आमदारांना मुंबईहून जयपूरला रवाना करण्यात येणार आहे. उद्या सर्व आमदारांची मातोश्रीवर बैठक बोलावली आहे. या बैठकीत उद्धव ठाकरे आमदारांशी चर्चा करणार आहेत. त्यानंतर हे सर्व आमदार जयपूरला रवाना होणार आहेत. मात्र शिवसेना आमदारांची गोव्याला जाण्याची इच्छा असल्याचे शिवसेना आमदार अब्दुल सत्तार यांनी सांगितले आहे.