breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रमहाराष्ट्र

शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हावा, यासाठी पायी वारी करणारा विठ्ठल भक्त मातोश्रीकडे रवाना

पंढरपूर – महाराष्ट्राच्या विधानसभेवर शिवसेनेचा भगवा फडकावा आणि मुख्यमंत्री शिवसेनेचाच व्हावा, यासाठी पायी वारी करणारा विठ्ठल भक्त मातोश्रीच्या दर्शनासाठी मुंबईकडे रवाना झाला आहे. सांगलीचे शिवसैनिक संजयकुमार सावंत विठोबाचा प्रसाद घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी पुन्हा पायी निघाले आहेत.

गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर महाविकास आघाडीचं सरकार स्थापन होण्यापूर्वी बरीच राजकीय तणातणी झाली. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकाला मुख्यमंत्रिपदी बसवण्याचा चंग बांधला होता. त्या काळात शिवसैनिकाला मुख्यमंत्रिपद मिळावे, यासाठी शिवसैनिकांनीही उपास-तापास, नवस केल्याचं पाहायला मिळत होतं.

सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील बनाळी गावच्या संजयकुमार सावंत यांनीही शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हावा यासाठी देवाचा धावा केला होता. त्यावेळी त्यांनी बनाळी ते पंढरपूर दरम्यान पायी वारी केली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संजयकुमार यांच्या तपश्चर्येची दखल घेऊन त्यांना शपथविधीसाठी विशेष निमंत्रणही दिले होते.

हाच शिवसैनिक आता यावर्षीची कार्तिकीची वारी ‘मातोश्री’पर्यंत पोहोचवण्यासाठी निघाला आहे. विठोबाचा प्रसाद घेऊन संजयकुमार उद्धव ठाकरे यांना भेटायला पायी निघाले आहेत. विशेष म्हणजे त्यांनी यापुढे दरवर्षीच बनाळी ते पंढरपूर आणि पुढे मातोश्रीपर्यंत वारी करण्याचा संकल्प केला आहे.

पंढरपुरात येऊन त्यांनी चंद्रभागेचं तीर्थ, पेढे देऊन विठोबाला प्रिय तुळशी माळ घेतली आणि संत नामदेव महाराज पायरीला प्रार्थना केली. हा प्रसाद ते मातोश्रीवर जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देणार आहेत. राज्य कोरोनामुक्त व्हावे, तसेच उद्धव ठाकरे यांचा पाच वर्षाचा मुख्यमंत्रिपदाचा कार्यकाळ निर्विघ्न पार पडावा, यासाठी संजयकुमार वारी करत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button