मनसेचा ‘एनआरसी’ला पाठिंबा!
मुंबई | महाईन्यूज
पाकिस्तान आणि बांगलादेशातून लाखो मुसलमानांनी भारतात घुसखोरी केली असून, त्यांना हाकलून देण्याची गरज आहे. त्यासाठी ९ फेब्रुवारी रोजी आझाद मैदानावर मोर्चा काढण्याची घोषणा करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुरुवारी राष्ट्रीय नागरिक नोंदणीला (एनआरसी) अप्रत्यक्षपणे पाठिंबा दिलेला आहे. मनसेच्या राज्यस्तरीय अधिवेशनात राज ठाकरे यांनी हिंदुत्वावर भर देत पक्षाची आगामी वाटचाल जाहीर केली.
मनसेच्या संपूर्ण भगव्या रंगातील आणि छत्रपतींची राजमुद्रा असलेल्या नव्या झेंडय़ाचे अनावरण राज यांच्या हस्ते झाले. या वेळी राज यांचे चिरंजीव अमित यांची नेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच कृषी, महिला, शिक्षण आदी अनेक विषयांवर पदाधिकाऱ्यांकडून ठरावही मांडण्यात आले आहे.मनसेच्या स्थापनेच्या वेळी ‘मी महाराष्ट्राचा आणि महाराष्ट्र माझा’ अशी भूमिका मांडणाऱ्या राज यांनी अधिवेशनात ‘मी मराठीही आहे आणि हिंदूदेखील आहे’ अशी भूमिका जाहीर केली. मराठीला नख लावण्याचा कोणी प्रयत्न केला तर मराठी म्हणून आणि हिंदू म्हणून कोणी विरोध केला तर हिंदू म्हणून मी उभा राहीन, असे त्यांनी सांगितले. प्रत्येकाने आपला धर्म घरात ठेवावा, असे सांगत मशिदीवरील भोंग्यांना राज यांनी विरोध केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जेथे विरोध करायचा तेथे विरोध केला. अनुच्छेद ३७० रद्द केले तेव्हा त्यांचे कौतुकही केल्याचे सांगत आपली ‘मोदी-शहामुक्त भारत’ ही भूमिका त्यांनी मवाळ केलेली आहे.