शहरी मतदारांत काम करा’ – शरद पवार
मुंबई – महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये काम करताना मंत्र्यांनी जनहिताच्या कामांना प्राधान्य देतानाच, उपेक्षित वंचित समाजघटकांमध्ये, तसेच शहरी भागातही जनाधार वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत, अशा सूचना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी दिल्या.
मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कॅबिनेट व राज्यमंत्र्यांची तीन तास बैठक घेऊन सरकारमध्ये काम करताना घ्यावयाची काळजी आणि जनता व पक्ष संघटनेच्या कार्यकर्त्यांशी संवाद याबाबत मार्गदर्शन केल्याचे सांगण्यात येते. राज्यात सरकार स्थापन झाल्यानंतर त्यात सहभागी असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने मंत्र्यांच्या अशा बैठका घेतल्या आहेत. राज्यात महाविकास आघाडी सरकार असल्यामुळे तीन पक्षांमध्ये समन्वय कसा असावा याबाबत शरद पवार यांनी मंत्र्यांना मार्गदर्शन केले.