शरीफ यांच्या वक्तव्याचा परिणाम – मुंबई हल्ल्याच्या सुनावणीला वेग…
इस्लामाबाद – 26/11 च्या मुंबईवरील 26/11 च्या दहशतवादी हल्ल्याबाबत नवाब शरीफ यांनी केलेल्या धक्कादायक निवेदनानंतर पाकिस्तमध्ये खळबळ माजली आहे. एवढेच नाही, तर त्यासंबंधातील न्यायालयीन प्रक्रियेलाही वेग आला आहे. इतकी वर्षे थंडावलेली 26/11 च्या खटल्यची सुनावणी प्रक्रिया वेगाने सुरू झाली आहे. दहशतवाद विरोधी न्यायालयाने 2 साक्षीदारांना न्यायालयात हजर राहण्यास सांगितले आहे. इतकेच नव्हे, तर त्या संबधातील 27 भारतीय साक्षीदारांबाबत योग्य ती माहिती देण्याचे अधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत. सदर खटल्याची सुनावणी लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या दृष्टीने न्यायालयाने आदेश दिले आहेत. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांनी 26/11 च्या खटल्याची सुनावणी प्रलंबित राहण्याबाबत प्रश्न उपस्थित केले होते.
26/11 च्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानमधील लष्करे तैयबच्या 10 दहशतवाद्यांनी मुंबईत एकाच वेळी अनेक ठिकाणी हल्ले करून 166 जणांना ठार केले होते. या हल्ल्यांमध्ये अनेकजण जखमी झाले होते. या 10 दहशतवाद्यांपैकी 9 जण सुरक्षा दलांबरोबरच्या चकमकीत मारले गेले होते, तर अजमल कसाबला जिवंत पकडण्यात आले होते. न्यायालयीन प्रक्रियेनंतर त्याला फाशी देण्यात आली होती.
अजमल कसाबला पाकिस्तानने आपला नागरिक मानण्यास नकार दिला होता. परंतु आंतरराष्ट्रीय दबावापुढे झुकत सन 2009 मध्ये एफआयआर दाखल करण्यात आला. र्तेव्हापासून या खटल्याची सुनावणी चालू होती.
बुधवारी न्यायमूर्ती शाहरूख आर्जुमंद यांच्या न्यायालयाने दोन अधिकाऱ्यांना समन्स जारी केले आहे. याची पुढील सुनावणी 23 मे रोजी होणार आहे. आतापर्यंत 68 जणांच्या साक्षी नोंदवण्यात आल्या असून लष्कर ए तैयबाचा कमांडर जकीउर रहमान लखवीसह 8 जणांवर आरोपपत्र दाखल करण्यात आलेले आहे.