विरोधी पक्षाला समुपदेशनाची गरज; सामानातून भाजपवर टीका
मुंबई | महाईन्यूज
मेहक प्रभू या मुलीने झळकविलेल्या ‘फ्री कश्मीर’ फलकाबाबतही विरोधी पक्षनेत्यांनी सारासार विचार न करता सरकारवर टीका केली आणि नंतर मेहक प्रभूने नेमकं काय केलं, हे स्पष्ट झाल्यावर ते तोंडावर आपटले आहे. विरोधी पक्षाने प्रतिष्ठा गमावणे, स्वतःची विश्वासार्हता घालवून बसणे महाराष्ट्राला परवडणारे नाही. आम्हाला विरोधी पक्षाची काळजी वाटते असं म्हणत विरोधी पक्षाला समुपदेशनाची गरज असल्याची टीका सामानातून शिवसेनेनं भाजपावर केलेली आहे.
महाराष्ट्रातील विरोधी पक्ष रोज स्वतःचे हसे करून घेत आहे याचे आम्हाला अतीव दुःख होत आहे. विरोधी पक्षाचे इतके अधःपतन किंवा बेइज्जती गेल्या पन्नास वर्षांत कधीच झाली नव्हती, पण माजी मुख्यमंत्री फडणवीस हे जेव्हापासून विरोधी पक्षनेतेपदावर विराजमान झाले आहेत तेव्हापासून विरोधी पक्ष दिशाहीन आणि भरकटलेला झाला आहे. लोकशाहीसाठी हे चित्र चांगले दिसत नाहीये. फडणवीस यांचे हे असे का झाले आहे, ते महाराष्ट्राला चांगलेच माहीत आहे. सत्ताधाऱयांवर ते रोज एक भंपक, बिनबुडाचा आरोप करतात व नंतर तोंडावर आपटतात याचे आमच्याइतके वाईट कुणालाच वाटत नसेल, असं म्हणत शिवसेनेनं सामनाच्या संपादकीयमधून भाजपवर निशाणा साधला आहे.