breaking-newsराष्ट्रिय
विरोधी पक्षांनाही राम मंदिराला विरोध करता येणार नाही: मोहन भागवत
हरिद्वार– आता अगदी विरोधी पक्षांना सुद्धा अयोध्येतील राम मंदिराला विरोध करता येणार नाही असे प्रतिपादन सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले आहे. पतंजली योगपीठाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे प्रतिपादन केले. ते म्हणाले की राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पार्टी हे दोघेही अयोध्येतील राम मंदिर उभारणी करीता वचनबद्ध आहेत. तथापी तेथील मंदिर उभारणीच्या बाबतीत काही बाबींना वेळ लागणार आहे.
ते म्हणाले की प्रत्येक सरकारला आपल्या मर्यादा आहेत. त्यांना काही दबावाखालीच काम करावे लागते. तथापी संत आणि महंतांना कोणताही दबाव नसतो ते या साऱ्या दबावाच्या बाहेर असतात. त्यांनी देश, धर्म आणि समाजाच्या उत्थानासाठीच काम केले पाहिजे. पतंजली पीठाचे प्रमुख बाबा रामदेव यांनी यावेळी बोलताना सांगितले की जेथे मंत्री किंवा श्रीमंत माणसांना हात टेकावे लागतात तेथे साधू यशस्वी होतात. साधु आणि संत हे मंत्र्यांपेक्षा अधिक सक्षम असतात आणि ते जे काम हाती घेतात तेथे ते यशस्वीच होतात.