विरोधकांची महाआघाडी लोभ, लालसेची – अमित शहा
भाजपविरोधी पक्षांच्या महाआघाडीवर भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी जोरदार टीका केली आहे.सदर आघाडी ही लोभ आणि लालसेची आघाडी असून त्यांच्याकडे पंतप्रधानपदाचे नऊ दावेदार आहेत, असे शहा यांनी म्हटले आहे.
केवळ २०-२५ नेत्यांना एकाच व्यासपीठावर आणून काहीच साध्य होणार नाही कारण नरेंद्र मोदी हेच पुन्हा पंतप्रधान होणार आहेत. व्यासपीठावर २३ नेते उपस्थित होते त्यापैकी नऊ जण पंतप्रधानपदाचे दावेदार आहेत, असेही शहा म्हणाले. मात्र आमच्याकडे केवळ एकच उमेदवार आहे आणि तो म्हणजे नरेंद्र मोदी, असे ते म्हणाले. मात्र शहा यांनी कोणाचाही नामोल्लेख केला नाही. पश्चिम बंगालमधील तृममूल सरकार उलथून टाकण्याचा निर्धारही शहा यांनी व्यक्त केला.
सर्व बंगाली निर्वासितांना नागरिकत्व विधेयक मंजूर झाल्यानंतर नागरिकत्व देण्यात येईल, अशी घोषणा शहा यांनी मंगळवारी येथे केली आणि पश्चिम बंगालमध्ये पक्षाच्या प्रचाराची सुरुवात केली. मालदा येथे एका मेळाव्यात शहा यांनी राज्यातील सत्तारूढ तृणमूल काँग्रेसवर टीका केली. लोकसभेच्या आगामी निवडणुका राज्यात लोकशाही स्थापित करण्यासाठी असतील, असेही ते म्हणाले.
नागरिकत्व विधेयक मंजूर झाल्यानंतर सर्व बंगाली निर्वासितांना नागरिकत्व देण्यात येईल असे आश्वासनही या वेळी शहा यांनी दिले. तृणमूल सरकारने निर्वासितांसाठी काहीही केले नाही, मात्र आम्ही त्यांना नागरिकत्व देऊ, असेही ते म्हणाले.
कोलकाता येथे अलीकडेच झालेल्या भाजपविरोधी पक्षांच्या मेळाव्यामध्ये भारत माता की जय, अथवा वंदे मातरम् एकदाही म्हटले गेले नाही, मोदी, मोदी असाच गजर सुरू होता. विरोधी पक्षांची आघाडी ही सत्ता मिळविण्यासाठी आणि वैयक्तिक हित जपण्यासाठी असल्याची टीकाही शहा यांनी केली. विरोधी पक्षांना मोदी यांना हटविण्याची इच्छा आहे तर आम्हाला गरिबी आणि भ्रष्टाचार हटवायचा आहे, असेही ते म्हणाले.