#Budget2020 : वीज चोरी रोखण्यासाठी केंद्राचा फंडा, ‘प्रीपेड मीटर’ होणार बंधनकारक
नवी दिल्ली |महाईन्यूज | ऑनलाईन टिम
वीज चोरी रोखण्यासाठी केंद्राने अत्यंत महत्त्वाची सूचना केली आहे. देशभरात 1 एप्रिलपासून प्रत्येक घराला वीजेचे प्रीपेड मीटर लावणे बंधनकारक होणार आहे. 2022 पर्यंत हे काम पूर्णत्वाला नेण्याचे उद्दीष्ट ठेवले आहे. त्यानंतर वीज हवी असल्यास रिचार्ज करावे लागणार आहेत. रिचार्ज केलेले नसेल तर घरात वीज पुरवठा होणार नाही. मोबाइल फोन प्रमाणे आता वीजेच्या मीटरला रिचार्ज करावा लागणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज अर्थसंकल्पीय भाषणात याविषयी माहिती दिली.
मोदी सरकारच्या दुसऱ्या वर्षाचा दुसरा अर्थसंकल्प निर्मला सीतारामन सादर करत आहेत. यामध्ये केलेल्या घोषणेनुसार दोन वर्षांमध्ये घरातील सर्व मीटर प्री पेड केले जाणार आहेत. टप्प्याटप्प्याने जुने मीटर हटवण्यात येतील. स्मार्ट मीटरमधून वीज सप्लाय केली जाणार आहे. यामध्ये वीजेचा दर निवडण्याचा पर्याय असेल. यासाठी 22 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
यासाठी स्मार्ट प्री पेड मीटरचे उत्पादन वाढवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. येत्या काही दिवसांमध्ये याची मागणी वाढणार आहे. यामुळे यापूर्वीच प्रीपेड मीटर बनवण्याचे काम सुरू करण्यात आले आहे, अशी माहिती सीतारामन यांनी दिली.