विरोधकांकडून राजकीय स्वार्थासाठी देशातील वातावरण बिघडवण्याचा कट- पीयूष गोयल
मुंबई | महाईन्यूज
सुधारित नागरिकत्व कायद्याबाबत एक तर विरोधकांचा गैरसमज झाला आहे किंवा ते जनतेत गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. जे पक्ष नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात प्रचार करत आहेत, ते राजकीय स्वार्थासाठी देशातील वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी केलेला आहे.सुधारित नागरिकत्व कायद्याबाबत इंडियन मर्चंट चेंबर्स येथे शुक्रवारी ते बोलत होते.
सुधारित नागरिकत्व कायद्याला सर्वांनी खुल्या दिलाने स्वीकारलेच पाहिजे, कारण या कायद्यामुळे शरणार्थींना चांगले दिवस येतील. हा कायदा अचानक आणलेला नाहीये व भाजपने याबाबत आपल्या घोषणापत्रात आश्वासन दिले होते. भाजप सरकार जनहिताची अनेक कामे करत आहे. विरोधक सुधारित नागरिकत्व कायद्याबाबत गैरसमज पसरवत आहेत. तो दूर करण्यासाठी भाजप मुंबईत १० दिवस जनसंपर्क अभियान कार्यक्रम राबविणार असून, या अंतर्गत तीन कोटी कुटुंबीयांना याबाबत माहिती दिली जाईल, असे त्यांनी सांगितले आहे.