विद्यार्थ्यांनो.. अर्ज पुन्हा एकदा तपासा..!
- सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर : हरकती असल्यास मार्गदर्शन केंद्रावर जा
पुणे- अकरावी प्रवेशाची सर्वसाधारण यादी संकेतस्थळावर जाहीर झाली असून विद्यार्थ्यांनी या यादीनुसार आपली सर्व माहिती तपासायची आहे. त्यानुसार त्यांना त्याबाबत काही अडचण असल्यास त्यांनी मार्गदर्शन केंद्रावर दुरुस्तीबाबतचे पुरावे घेऊन जायचे आहेत, अशी माहिती अकरावी केंद्रीय प्रवेश समितीच्या प्रभारी अध्यक्षा मिनाक्षी राऊत यांनी दिली.
अकरावी प्रवेशासाठीची सर्वसाधारण यादी शुक्रवारी सायंकाळी जाहीर करण्यात आली. यामध्ये प्रवेशासाठी अर्ज केलेल्या सर्व विद्यार्थ्यांची माहिती संकेतस्थळावर जाहीर केली जाणार आहे. त्यामध्ये विद्यार्थ्यांनी आपले नाव, पत्ता, जात संवर्ग, गुण आदी सर्व गोष्टींची तपासणी करून त्यावर काही हरकती व सूचना असल्यास त्या दुरुस्त करून घ्यायच्या आहेत. याबाबत समितीच्या माहिती पुस्तिकेत दिलेल्या मार्गदर्शन केंद्रांवर जाऊन त्यांनी काही अडचणी असल्यास त्यांना सांगावयाचे आहे. यासाठी विद्यार्थ्यांनी सबळ पुरावा घेऊन जाणे अपेक्षित आहे. 2 जुलैपर्यंत विद्यार्थ्यांना या हरकती नोंदविता येणार आहेत. त्यानंतर त्या हरकतीनुसार दुरुस्ती व निवारण 3 जुलै रोजी केले जाणार आहे. त्यानंतर 5 जुलै रोजी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी जाहीर केली जाईल. दरम्याच्या काळात कोट्यातील प्रवेश शनिवारपासून सुरू होत असून विद्यार्थी यासाठी महाविद्यालय स्तरावर अर्ज स्विकारण्यात येतील व महाविद्यालय स्तरावरच त्यांची यादी लावण्यात येईल. हे प्रवेश ऑनलाईन प्रणालीत अपडेट केले जातील.