वारसा रक्तात असावा लागतो; पंकजा मुंडेंचा धनंजय मुंडेंवर निशाणा
भाषण आणि अभिनय करून वारसा येत नाही, तो रक्तात असावा लागतो, अशा शब्दात राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला आहे. गोपीनाथ मुंडे यांनी गृहमंत्री असताना मुंबईतील गुन्हेगारी मोडून काढली. तशीच जिल्ह्यतील गुंडगिरी मोडून काढण्याचे काम मी केले असून जिल्ह्यापुरती मीच गृहमंत्री असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
बीड जिल्ह्यात गोपीनाथगड येथे बुधवारी दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त मोफत दोन दिवसीय आरोग्य शिबिराला सुरुवात झाली. या शिबीराप्रसंगी संबोधित करताना पंकजा मुंडे म्हणाल्या, देशातील पाच राज्यातील निकालाचा महाराष्ट्रावर कोणताही परिणाम होणार नाही. काही जण या राज्यातील निकालावर मोठमोठी विधाने करत आहेत. त्यांचा पक्ष राज्याच्या बाहेर कोणाला माहीत तरी आहे का, असा सवाल त्यांनी विचारला.
दिवंगत गोपीनाथ मुंडे यांनी तिघी बहिणींना कोणत्याही परिस्थितीशी हिमतीने लढण्याचे संस्कार दिले. मागील चार वर्षांत आपण मुंडेंचा राजकीय व सामाजिक वारसा चालवण्याचा प्रयत्न आपल्या परीने करत आहोत, अशी भावनिक सादही त्यांनी उपस्थितांना घातली.
गोपीनाथ मुंडे यांनी गृहमंत्री असताना मुंबईतील गुन्हेगारी मोडून काढली. तशीच जिल्ह्यतील गुंडगिरी मोडून काढण्याचे काम आपण केले असून जिल्ह्यापुरती मीच गृहमंत्री असल्याचेही त्यांनी म्हटले. यामुळे पंकजा मुंडे यांना गृहमंत्रीपदाचे वेध लागले आहेत की काय, अशी चर्चाही सुरु झाली आहे.