वायसीएममध्ये औषधांचा तुटवडा, सर्वसामान्य रुग्णांची परवड
- नगरसेविका सुलक्षणा शिलवंत-धर यांचा आंदोलनाचा इशारा
पिंपरी – महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात (वायसीएम) औषधांचा तुटवडा जाणवत आहे. भांडार विभागाकडून औषधांची खरेदी करण्यात विलंब होत आहे. त्यामुळे रुग्णांचे प्रचंड हाल होत असून याकडे महापालिका आयुक्तांनी दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे औषधाची तात्काळ खरेदी करावी, अशी मागणी नगरसेविका सुलक्षणा शिलवंत-धर यांनी केली.
याबाबत महापालिका आयुक्त श्रावण हर्डिकर यांना निवेदन दिले. त्यात म्हटले आहे की, वायसीएममध्ये अल्प दरात उपचार होतात. त्यामुळे पुण्यासह राज्याच्या अनेक भागातून गोरगरीब रुग्ण उपचारासाठी गर्दी करीत असतात. मात्र औषधांचा सतत तुटवडा जाणवित आहे. तसेच डॉक्टर, नर्सेसची कमतरता भासत आहे.
शहरात साथीच्या आजारांनी डोके वर काढल्याने वायसीएम रुग्णालयात रुग्णांची वर्दळ वाढली आहे. रुग्णालयात अनेक दिवसांपासून औषधांचा तुटवडा जाणवत आहे. भांडार विभागाकडून औषधांची पुरेशी खरेदी केली जात नाही. पालिकेच्या सर्वच रुग्णालयांमध्ये नेहमीच औषधांची टंचाई जाणवत आहे. उपचाराअभावी अनेकांना पुण्याच्या ससून रुग्णालयात पाठविले जात आहे. ते रुग्णांच्या जिवावर बेतत आहे. वायसीएममध्ये रेबिजच्या लसींचा साठाही कमी पडत आहे.
नगरसेविका सुलक्षणा शिलवंत-धर म्हणाल्या की, ” सध्या टायफॉईड, डेंग्यू, मलेरिया, स्वाईन फ्लू अशा जीवघेण्या आजारांचा प्रादुर्भाव वाढत असतानाच शहरातील सर्वात मोठी वैद्यकीय सेवा पुरवणाऱ्या वायसीएमकडे सत्ताधारी आणि प्रशासन दुर्लक्ष करीत आहेत. औषधे उपलब्ध नसल्याने रुग्णांना हजारो रुपयांची औषधे खाजगी औषध विक्रेत्यांकडून विकत घ्यावी लागतात. रुग्णालयांत औषधे का उपलब्ध होत नाहीत यामागे नक्की काय गौडबंगाल आहे. याची चौकशीही झाली पाहिजे. त्यातच कर्मचाऱ्यांची मोठी कमतरता असून हे प्रशासन आणि सत्ताधारी रुग्णांच्या जीवाशी खेळत आहेत. यावर तात्काळ कारवाई करुन आवश्यक ती उपाययोजना करावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल. असा इशारा त्यांनी दिला आहे.”