वाढत चाललेल्या खर्चाला लागणार कात्री; आज मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प
मुंबई | महाईन्युज
मुंबई पालिकेचा अर्थसंकल्प आज आहे. मात्र, उत्पन्नात मोठी घट आणि आस्थापना खर्चात प्रचंड वाढ झाल्याचा मोठा फटका महापालिकेला आगामी आर्थिक वर्षात बसणार आहे. यामुळे सन २०२०-२०२१ या आर्थिक वर्षात कोणत्याही नवीन प्रकल्पांची घोषणा होणार नाही. याउलट थकबाकी वसूल करणे, वाढीव खर्चांना कात्री, कर्मचारी भरती रद्द आणि जुन्या प्रकल्पांच्या खर्चांमध्ये कपात करणारा अर्थसंकल्प सादर होण्याची शक्यता आहे. चालू आर्थिक वर्षाप्रमाणे आगामी वर्षातही विविध बँकांमधील ठेवीतून महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना वेग देण्याचा प्रयत्न होणार आहे.
सन २०१९-२०२० या आर्थिक वर्षांतील ३० हजार ६९२ कोटींचा अर्थसंकल्प तत्कालीन पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी सादर केला होता. मात्र, गेल्या एक वर्षात लोकसभा आणि विधानसभा निवडणूक झाल्यामुळे पालिकेच्या विकासकामांना ब्रेक लागला होता. त्यातच पाचशे चौरस फुटांच्या मालमत्तांना कर माफ करण्यात आल्याने, त्याचा मोठा भार महापालिकेवर पडला. या वर्षी मालमत्ता करातून ५८४४.९४ कोटी रुपये महसूल मिळण्याचा अंदाज होता. उद्दिष्टाच्या तुलनेत केवळ २३९४.३८ कोटी म्हणजे तब्बल ५० टक्के कमी वसुली झाली आहे. त्याचबरोबर, विकास कराच्या वसुलीतही मोठी घट झाली आहे. यामुळे पालिका आयुक्त प्रवीण परदेशी मंगळवारी आपल्या पहिल्या अर्थसंकल्पातून मुंबईकरांना काय देणार? याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.