लोक सत्तेसाठी जवानांच्या जीवाचा सौदा करू शकतात – उदित राज
नवी दिल्ली | पुलवामा हल्ल्यास एक वर्ष पूर्ण होत असताना काँग्रेस नेते सत्ताधारी भाजपवर निशाणा साधत आहेत. त्यातच काँग्रेस नेते उदित राज यांच्या विधानाने राजकारणात खळबळ उडाली आहे. पुलवामा हल्ल्यावर उदित राज यांनी काही ट्विट केले.
त्यामध्ये ते म्हणाले, “जे लोक सत्तेसाठी गुजरातमध्ये नरसंहार घडवू शकतात, ते सत्ता टिकवण्यासाठी 40 जवानांच्या जीवाचा सौदा देखील करू शकतात. या लोकांसाठी देशभक्ती आणि राष्ट्रवाद जनतेला भ्रमित करण्याचे एक साधन आहे.” उदित राज एवढ्यातच थांबले नाहीत. त्यांनी पुलवामा हल्ल्यावरून भाजप सरकारवर टीका करताना एकानंतर एक गंभीर आरोप केले आहेत.
काँग्रेस नेते उदित राज यांनी आपल्या आणखी एका ट्विटमध्ये म्हटले, “राहुल गांधींनी योग्य प्रश्न उपस्थित केला, की पुलवामा हल्ल्याच्या चौकशीचा निकाल अद्याप समोर आला नाही. गृहमंत्रालयाला आधीच माहिती मिळाली होती, की जवानांना रस्त्यावरून नव्हे, तर हवाई मार्गे न्यायला हवे. तरीही परवानगी नाकारण्यात आली. राजकीय लाभ मिळवण्यासाठी ही घटना घडू दिली.”