लोकांच्या हातात पैसे दिले तरच अर्थव्यवस्था रुळावर येईल : अभिजीत बॅनर्जी
नवी दिल्ली : “कोरोना व्हायरसमुळे आलेल्या साथीच्या रोगामुळे देशाची अर्थव्यवस्था कोलमडली आहे. भारताची अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी सरकारला देशातील लोकांपर्यंत पैसे पोहोचवावे लागतील. अमेरिकेने असं केलं आहे तर आपणही करु शकतो,” असं वक्तव्य भारतीय वंशाचे नोबेल पुरस्कार विजेते अर्थतज्ज्ञ अभिजीत बॅनर्जी यांनी केलं. काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी कोरोना संकट आणि अर्थव्यवस्था मुद्द्यावर आज (5 मे) अर्थतज्ज्ञ अभिजीत बॅनर्जी यांच्याशी बातचीत केली.
“ही साथ अद्याप आटोक्यात आलेली नाही आणि जे उपाय केले जात आहेत, त्यावरुन सध्याची मोठी चिंता आहे की अर्थव्यवस्था पुन्हा कशी स्थिरस्थावर होईल? पण आपल्याला आशावादी राहायला हवं की देशाची आर्थिक स्थिती सुधारेल. फक्त योग्य निर्णय घेतले जावेत,” असं अभिजीत बॅनर्जी म्हणाले.
“कोरोना संकटामुळे डगमगलेल्या अर्थव्यवस्थेला रुळावर आणण्यासाठी देशातील मोठ्या लोकसंख्येच्या हातात थेट पैसे पोहोचवावे लागतील,” असं अभिजीत बॅनर्जी म्हणाले. राहुल गांधी यांच्यासोबतच्या व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून झालेल्या या चर्चेदरम्यान बॅनर्जी यांनी या मुद्द्यावर जोर दिला की, “भारत सरकारने अमेरिका किंवा इतर देशांप्रमाणे मोठं प्रोत्साहन पॅकेज द्यायला हवं, जेणेकरुन लोकांच्या हातात पैसा येईल आणि बाजारात मागणी वाढेल.”
“मागणीची कमतरता हा प्रमुख मुद्दा आहे. लोकांच्या हातात पैसे दिले तर अर्थव्यवस्थेचं चाक फिरवता येईल. अमेरिका हे मोठ्या प्रमाणावर करत आहे. आपणही असं करु शकतो. तिथे रिपब्लिकन सरकार आहे, जे काही फायनान्सर चालवतात. तिथे समाजवादी विचारसरणीचं उदारमतवादी सरकार नाही. पण लोक आहेत जे आर्थिक क्षेत्रात काम करतात. अर्थव्यवस्था वाचवण्यासाठी लोकांच्या हातात पैसा दिला पाहिले असा त्यांनी निर्णय घेतला. आपल्याला यातून बोध घ्यायला हवा, असं मला वाटतं,” असं अभिजीत बॅनर्जी म्हणाले.