लोकल सुरू करण्याचा निर्णय 15 डिसेंबरनंतरच; मुंबई महापालिका आयुक्तांचे स्पष्टीकरण
मुंबई – आपल्यासाठी लोकल कधी सुरू होणार याची सर्वसामान्य नागरिक आतुरतेने वाट पाहत आहेत. तर दुसरीकडे मागील काही दिवसांपासून मुंबईतील कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे लोकल सुरू करण्याबाबतचा निर्णय हा १५ डिसेंबरनंतर घेऊ, असे मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी सांगितले आहे.
‘मुंबईत सध्या दिवाळीनंतर कोरोना रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे सध्या आमचं याकडे लक्ष आहे. यामुळे मुंबई लोकल सुरू करण्याचा निर्णय हा 15 डिसेंबरनंतर घेऊ’, असे आयुक्त म्हणाले. त्याचबरोबर ‘राज्य सरकारने आपल्या राज्यात येणाऱ्या प्रवाशांवर निर्बंध लादले आहेत. त्यामुळे जर कोणाला मुंबई किंवा महाराष्ट्रात यायचे असेल, तर कोरोना चाचणीचा अहवाल दाखवणे बंधनकारक असणार आहे. मुंबईतसुद्धा मोठ्या प्रमाणात प्रवासी विमान आणि रेल्वे येत असतात. पालिका प्रशासन त्याची अंमलबजावणी करत आहे. त्यामुळे कोणालाही कोरोना निगेटिव्ह अहवाल नसेल, तर मुंबईत घेतले जाणार नाही’, असेही यावेळी आयुक्तांनी स्पष्ट केले.
तसेच ‘मुंबईतील रेल्वेच्या स्टेशनवरही तपासणी सुरू केली आहे. मुंबईत सध्या कोरोनाची स्थिती ही नियंत्रणात आहे. बेड योग्य प्रकारे उपलब्ध आहेत. त्यामुळे कोरोनाची लाट येईल की नाही हे माहित नाही पण पालिकेने याचे नियोजन सुरू केले आहे. त्यामुळे आता लोकांनी जे नियम दिले ते पाळणे गरजेचे असणार आहे’, असेही इक्बालसिंग चहल म्हणाले.